
कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात सण, उत्सव हे अगदी बेताने, मोजून मापून करायची पद्धत दिसून येते. त्यावरून विनोद निर्मिती, टोमणे हे ओघाने आलेच. दीड दिवसाचा गणपती आणि खड्यांच्या गौरी ह्या दोन गोष्टींवरून तर कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबांना कंजुषी आणि काटकसरीच्या परमोच्च स्थानावर नेऊन बसवलं आहे. बरं ह्याला काही अपवाद जरी असले तरी सरसकटीकरण झालेलं दिसतं. अर्थात कोकणस्थ मंडळी हे टोमणे तेवढ्याच ताकदीने टोलवीत असतात हे वेगळं सांगायची गरज नाही.
माझ्या माहेरी फक्त गणपती बसवत असू. गौरी नसायची. आजू बाजूला कोकणस्थ गोतावळ्यात ही गौरी बद्दल काही विशेष उत्साह, खळबळ कधी दिसली नाही त्यामुळे कधी त्याबद्दल उत्सुकता वाटली नाही. मग पहिल्यांदा देशस्थ कुटुंबातील गौरी ची सजावट बघितली, खूप छान वाटली. गौरी म्हणजे गणपती ची आई हे नव्याने कळलं. पण माझा पुढचा प्रश्न तयार होता. आई एक आहे, मग दोन मुखवटे का बरं? उत्तर तयार होतं. आई आणि तिची सखी किंवा मैत्रीण . पण परत पुढचा प्रश्न तयार होताच माझा. मग गणपती च्या आदल्या दिवशी हरतालिका असते. तेंव्हा ह्याच दोघींची पूजा होते, मग परत का बरं करायची पूजा? एव्हाना कुठल्या तरी आजीचे किंवा आईचे धपाटे खाण्याच्या range मध्ये मी आलेली असायची. पण मला काही संयुक्तिक उत्तर मिळालं नाही.
लग्न झाल्यावर सासरी गौरी-गणपती असतात ह्याचा पत्ता लागला. इथे मात्र खड्यांच्या गौरी बसतात हे कळलं. आधी वाटलं होतं की गौरीचे खडे म्हणजे काहीतरी विशेष प्रकारचे खडे असतील. पण खडे म्हणजे बागेतील किंवा कुंडीतील खडे बघितल्यावर माझी पार निराशा झाली. पाणवठ्यावरून सात खडे आणायचे किंवा तुळशीतून खडे आणायचे आणि त्याची पंचोपचारी किंवा षोडशोपचारी पूजा करायची आणि गणपती शेजारी त्यांची स्थापना करायची. लहानपणी पडलेले सर्व प्रश्न सासूबाईंना विचारले. त्यांच्याकडेही उत्तरं नव्हती. धपाट्यांच्या जागी “आम्ही नाही बाई असलं काही आमच्या सासूबाईंना विचारलं. कर म्हणल्या ते केलं” हे फक्त ऐकायला मिळालं. असो, कुळाचार म्हणून सर्व करत राहिले.
गेल्यावर्षी गणपती – गौरी उत्सवा दरम्यान माझ्या वाचनात श्री. मकरंद करंदीकर ह्यांचा एक लेख आला. Whatsapp वरील “माहितीपर” लेख मी सहसा वाचत नाही. पण लेखाचं शीर्षक होतं “कोकणस्थ ब्राह्मणांच्या गौरी ७ खड्यांच्या का ?” शीर्षक वाचल्यावर मला कोण आनंद झाला. इतके वर्ष मी जी उत्तरं शोधत होते ती आता मिळणार होती. मुळात मला जे प्रश्न पडले होते ते अजून कोणाला तरी पडले होते आणि त्याची उत्तरं ही मिळाली होती ह्याचा जास्त आनंद झाला होता.
श्री. मकरंद करंदीकर ह्यांनी सात खडे का ह्याचे विस्तृत विश्लेषण दिले आहे. त्याची पार्श्व भूमी ही सांगितली आहे. कोकणात पावसाचे प्रमाण खूप जास्त असते. पाणवठा आणि महिला वर्गाचा खूपच जवळचा संबंध. नळ योजना गावांमध्ये पोचायच्या आधी पूर्वापार रोजच्या वापरासाठी पाणी भरणे, भांडी घासणे, कपडे धुणे वगैरे ही सर्व कामे स्त्रिया करत आणि ते ही पाणवठ्यावर जाऊन. पावसाळ्यात अश्या ठिकाणी अपघात, अपमृत्यु होण्याची शक्यता खूपच जास्त. अश्या घटना घडल्या की त्याबद्दल अनेक भय कथा, गूढ कथा, दंत कथा तयार होतात आणि आपोआप भीतीचे वातावरण तयार होतं. आणि भक्ती ऐवजी भीती पसरवली जाते.
पुढे लेखात, श्री. करंदीकर लिहितात की आपल्या पुराणात सप्त तीर्थ, सप्त मातृका, सात नद्या ह्या संकल्पना मांडलेल्या आहेत. त्याच बरोबर सप्त देवतांची सुद्धा संकल्पना मांडलेली आहे. विहिरी, तळी, सरोवर, पाणवठे अश्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे असं मानलं जातं. कोकणस्थांकडे ह्या सात देवतांची सात खड्यांच्या रूपात पूजा केली जाते. खडे रूपी देवता घरात घेताना “ज्येष्ठे, श्रेष्ठे, तपोनिष्ठे, धर्मीष्ठे, सत्यवाहिनी, समुद्रवसने देवी, ज्येष्ठा गौरी नमोस्तुते।” ह्या श्लोकाचे उच्चारण करायची पद्धत आहे.
ह्या सप्त देवतांची नावे मत्सी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा, मकरी अशी आहेत. आता ही नांव नीट बघितली तर लक्षात येईल की ही जलाचरांची नावे आहेत – मत्सी म्हणजे मासा, कूर्मी म्हणजे कासव, कर्कटी म्हणजे बहुदा खेकडा, मकरी म्हणजे मगर, इत्यादी.. ही माहिती वाचली आणि ज्येष्ठा गौरी च्या सणा बद्दल माझ्यात विशेष उत्साह संचारला. म्हणजे ज्येष्ठा गौरी हा सृजनाचा सण आहे आणि त्या मध्ये ह्या सप्त देवतांना पुजले जाते. एवढ्यावर माझे शंका निरसन झाले होते. पण मला आपल्या संस्कृती बद्दल, सणां बद्दल अजून एक सुखद धक्का बसणार होता ह्याची हा लेख वाचताना मला कल्पना ही नव्हती.
गेली काही वर्ष सरकार पुण्यातील नदी किनारे सुशोभिकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. ह्याला पर्यावरणवादी मंडळी विरोध करत आहेतच आणि अनेक नागरिकांनाही सरकारने मांडलेल्या सुशोभिकरण पद्धती मान्य नाही. त्या मध्ये असलेली झाडे तोडून तिथे concrete ओतून काही “सुधारणा” करण्याचे नियोजन सरकारने केलं आहे. माझा ह्या सगळ्याला अर्थातच विरोध आहे. मुळात नदी स्वतः इतकी सुंदर असते, त्याला सरकार कुठली शोभा आणणार? ते ही असंख्या मोठाली झाडे तोडून! ही माझ्या सामान्य बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे. माझ्या कडून काही माफक प्रयत्न मी करत असते. कुठे मोर्च्यात सामील झाले, कुठे petition वर सह्या केल्या, कोणाला पत्र पाठवलं. ह्या सगळ्या गोष्टींनी खरच काही उपयोग होईल का अशी शंका मनात येत राहते.
ह्याच संदर्भात गेल्यावर्षी परिणीती दांडेकर ह्यांचे एक व्याख्यान माझ्या ऐकण्यात आले. नदी हा परिणीती दांडेकर ह्यांच्या खास अभ्यासाचा विषय. नदी सुशोभिकरण ह्या विषयाला अनुसरून त्यांचे व्याख्यान होते. सामान्य नागरिकांनीं नदी सुशोभिकरण चांगले की वाईट हे कसे ठरवायचे ह्या बद्दल ची त्रिसूत्री त्यांनी ह्या व्याख्यानात मांडली होती. ती त्रिसूत्री म्हणजे “झाड – डोह – मासा”. म्हणजेच ज्या सरकारी किंवा अन्य योजनांमुळे नदीशी संबंधित असलेल्या ह्या तीन घटकांना त्रास होईल किंवा त्याचे नुकसान होईल त्या गोष्टी करणे टाळायच्या.
ह्या तिन्ही सूत्रांचे महत्व त्यांनी समजावून सांगितलं. नदी साठी झाड का महत्वाचं, तर बहुतांश नद्यांचा उगम हा झाडा खाली असतो. म्हणून झाडे वाचवणे हे अतिशय महत्वाचं. मासे अर्थात नदीतील जीव. नदीमध्ये concrete किंवा तत्सम गोष्टी वापरल्या तर निश्चितच नदीतील जीव सृष्टी धोक्यात येईल. नदीतील जीव सृष्टीला धोका निर्माण झाला की त्यावर अवलंबून असलेले उभयचर, पक्षी आणि प्राणी ह्या सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून मासे धोक्यात येतील अश्या सर्व गोष्टी टाळणे. तिसरा घटक म्हणजे नदीचा डोह. नदीचा डोह हा नदीचा सर्वात सृजनशील भाग. म्हणजे नदीतील जलचर नदीतील डोहात आपल्या पुढच्या प्रजेला जन्माला घालतात. म्हणून डोह अत्यंत महत्वाचा. त्याला जपलं पाहिजे.
पुढे त्यांनी जे सांगितलं त्याने खरोखर मी आपल्या पूर्वजांच्या विचारा पुढे नतमस्तक झाले. आपल्या पूर्वजांकडे नदीची काळजी कशी घ्यायची ह्याची निश्चित संकल्पना होती. नदी जपायची म्हणजे नदीचे डोह जपायचे. पण नदीचा डोह सामान्य माणसाने कसा ओळखायचा? परिणीती दांडेकर ह्यांनी पुढे सांगितलं की महाराष्ट्रात अनेक नद्यांच्या काठी “साती आसरा” (म्हणजे करंदीकरांच्या लेखात वाचलेल्या सात अप्सरा किंवा सप्त देवता) ची मंदिरे आहेत. जसे आजकाल आपण Google वर एखादे ठिकाण “pin” करून ठेवतो, तशी ही मंदिरं म्हणजे पूर्वीच्या काळची “pinned locations” असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सामान्य माणसाला नदीचा डोह जपा असं म्हटलं तर कदाचित नाही कळणार. पण त्याला सांगितलं की साती आसरांची पूजा करा, तर त्या अनुशंघाने नदीचा डोह आपोआप जपला जाईल, ही योजना आपल्या पूर्वजांनी केली.

पूर्वजांचे हे विचार आपल्या पर्यंत पोचले नाहीत हे आपले दुर्दैव! हे विचार माहिती नाहीत म्हणून आपण सहज आपल्या चालीरीतीना, सणांना “irrelevant” ठरवून त्यांना आपल्या आयुष्यातून दूर करून टाकतो. किंवा त्या “सुधारण्याचा” प्रयत्न करत राहतो. आज काल बाजारात ज्येष्ठा गौरी पुजण्यासाठी सोन्या-चांदीचे खडे मिळू लागले आहेत. काही ठिकाणी तर चपट्या गोल दगडांवर सात देवींचे चेहरे रंगवून विकत मिळतात. मुळात ह्या सणाची संकल्पना जर नदी आणि त्यातील जलचर ह्यांचे पूजन आहे तर नदीवरून प्रत्येक जलचराचा एक असे सात खडे आणून त्यांची पूजा करणं हा किती साधा, सोपा, संयुक्तिक विचार आहे. साती आसरा ज्या ठिकाणी आहेत तिकडे जाऊन पूजे साठी खडे आणले तर वर्षातून एकदा तरी साती आसरा ह्यांचे ठिकाण बघून नदीचा डोह व्यवस्थित, सुरक्षित आहे ना, हे आपण तपासून बघू शकतो, हा ह्या पूजेचा मुख्य उद्देश. पूजेच्या रूपाने पूर्वजांनी आपल्या खांद्यावर नदी च्या संरक्षणाची जबाबदारी दिली आहे हे ह्या निमित्ताने मला नव्याने उमजले आहे! ही जबाबदारी कशी पार पाडता येईल आता ह्याचा विचार करते आहे…
सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१-सप्टेंबर-२०२५
thanks for sharing this much need thought. Hope this article reaches as many people , and we conserve all our ‘saticha asra’
LikeLike
धन्यवाद राधिका!
LikeLike
Nice information sharing
really unaware of this culture
Taking about river project & conservation
Taking all preventive measures is today’s need
Shivangi you r sharing good articles
Awaiting for your next article
LikeLike
धन्यवाद अतुल!
LikeLike