असं म्हटलं जातं की माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा जास्त उत्क्रांत झाला ह्याला ज्या अनेक गोष्टी कारणीभूत होत्या, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याचे अन्न शिजवून, प्रक्रिया करून म्हणजेच “स्वयंपाक” करून खाऊ लागला. अन्न शिजवून खाल्ले असता ते कमी लागते आणि कमी वेळा लागते. ह्या पृथ्वीवर दुसरा कोणताही प्राणी आपापले अन्न प्रक्रिया करून खात नाही असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. बहुतांशी प्राणी आपल्या जीवनातला खूप मोठा भाग अन्न शोधणे आणि खाणे ह्या मध्ये व्यतीत करतात. अन्न आणि सोबती शोधणे ह्या दोन क्रियांमध्ये मानवेतर प्राणीमात्र इतके व्यग्र आहेत की त्यांच्या मेंदूला दुसरा कुठला विचार करायची मुभा शिल्लकच राहिलेली नाही.
माणसाला “आग” किंवा “विस्तव” हाताळता येऊ लागला आणि स्वयंपाकाची खरी सुरुवात झाली. प्रथम अन्न नुसतेच उघड्या आगीवर भाजून घेणे, पुढच्या टप्प्यात अन्न आणि पाणी एकत्र करून ते आगीवर तापवून शिजवणे, त्या पुढील टप्प्यात हवे मधील जीवाणूंचा अन्ना मध्ये उपयोग करून घेणे (म्हणजेच अन्न पदार्थ फुगवणे, आंबवणे), अश्या चढत्या भाजणी ने अन्न शिजवण्याची प्रक्रिया उत्क्रांत होत गेली.
आपल्या भारत देशात अगदी वैदिक काळा पासून स्वयंपाकाचा सखोल विचार केला गेलेला आहे. कुठल्या ऋतू मध्ये काय खावे, कसे शिजवावे ह्या पासून स्वयंपाक घरातील कुठले पदार्थ कुठल्या व्याधीवर औषध म्हणून काम करतात इथपर्यंत विचार केला गेलेला आहे. आधुनिक भारतीय स्वयंपाक घरात वैदिक काळा पासून चालत आलेले पदार्थ आज सुद्धा अगदी आवडीने केले आणि खाल्ले जातात (उदा. इडली, कैरीचे पन्हे, खीर, पोळी, पुरी इत्यादी). पाककला हा आपण भारतीयांसाठी एक खूप महत्वाचा वारसा आहे हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये. मात्र हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आपल्या ह्या वारश्याला आता उतरती कळा लागली आहे.
जुन्या कुटुंबव्यवस्थे मध्ये घरातील कामे बाईमाणसाने करायची आणि बाहेरची कामे पुरुषमंडळींनी करायची अशी सुटसुटीत विभागणी होती. पुढील काळात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने कामासाठी बाहेर पडू लागली आणि तिला दुहेरी भूमिका पार पाडावी लागली. म्हणजे बाहेर नोकरी करायची आणि घरी येऊन घरची कामे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाची जबाबदारी ही पेलायची. पण त्या पुढील काळा पासून आज पर्यंत , मुलामुलींच्या शिक्षण आणि करिअरला प्राधान्य दिले गेले आणि इतर कामे, कौशल्ये जी मागील पिढ्यांमध्ये अगदी सहज आत्मसात होत असत (अगदी स्वयंपाकासह) ती सर्व मागे पडत गेली. बहुदा त्यामुळेच सध्या मोठ्या शहरांमध्ये आणि काही प्रमाणात खेड्यात सुद्धा घरी स्वयंपाक करून खाणे हे बऱ्याच तरुण मंडळींना संकट वाटते.
मुला मुलींनी आयुष्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी (म्हणजे “चांगले”, “उच्च” शिक्षण घेऊन “चांगल्या” career च्या मागे धावण्यासाठी) म्हणून गेल्या काही पिढ्यान् मधील पालक मंडळी मुलांना घरातील इतर कामांपासून दूर ठेवू लागले. मुलाचा किंवा मुलीचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अभ्यास, coaching class, co-curricular activities त्यांच्या मागे लावून दिल्यामुळे वेळच शिल्लक रहात नाही. आणि त्यामुळे मुलाला किंवा मुलीला स्वयंपाकातले कसे काही कळत नाही असं म्हणून पालक मंडळी आपली सुटका करून घेतात. किंवा आता शिकण्याचे वय आहे, स्वयंपाक वगैरे पुढे वेळ आली की शिकतील असं ही ऐकू येतं. मला तरी वाटतं की बाहेर पैसे खर्चून कुठले तरी औटघटकेचे फुटकळ कौशल्य आत्मसात करण्याचा नादात मुलं आणि मुली स्वयंपाक ह्या घरच्या घरी आणि विनामूल्य आत्मसात होणाऱ्या, सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या, त्याच बरोबर पराकोटीचा आनंद देणाऱ्या जीवनावश्यक कौशल्याला मुकतात.

स्वयंपाक शिकण्यासाठी कुठलं ठराविक वय नसतं. आणि आताच्या “युगात” स्वयंपाक करणे ही फक्त घरातील कर्त्या बाईची जबाबदारी असण्याची गरज राहिली नाहीये. अगदी बाल्यावस्थे पासून स्वयंपाक शिकता येतो. नव्हे, प्रत्येक आई-वडिलांनी जाणीवपूर्वक स्वयंपाक करताना आपल्या पाल्यांना लुडबुड करू दिली पाहिजे. ही लुडबुड म्हणजेच स्वयंपाक शिकायची पहिली आणि खूप महत्त्वाची पायरी होय. आमची मुलं लहान होती तेंव्हा स्वयंपाक करताना त्यांना स्वयंपाकाच्या कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवत असू. मटार सोलून ठेवणे, पालेभाजी निवडणे, गवार, पापडी सारख्या शेंगा वर्गीय भाजांच्या शिरा काढून देणे, पोळ्या करताना शेवटची एक छोटी पोळी करायला देणे इत्यादी. ह्याचे दोन थेट फायदे झाले, एक म्हणजे मुलांना वेगळा वेळ मुद्दाम द्यावा लागला नाही आणि आपण स्वयंपाक करत असताना त्यांना दुसऱ्या कुठल्या कामात किंवा activity मध्ये मुद्दाम गुंतवून ठेवावे लागले नाही. काही कापले, चटका बसला, डोळ्यातून पाणी आले तर “आला मंतर, कोल्हा मंतर,…” हा मंत्र म्हणून बाऊ बरा करायचा आणि कामं पुढे चालू ठेवायची.

स्वयंपाक करणे ह्या मध्ये फक्त पदार्थ करणे एवढेच अध्यरुत नाही. ढोबळ मानाने रोज काय स्वयंपाक करायचा ह्याची आखणी प्रत्येक कुटुंबात पिढ्यान् पिढ्या चालत आलेली असते. उदाहरणार्थ सर्वसाधारण भारतीय कुटुंबात सकाळी आणि संध्याकाळी जेवायला भात, भाजी, आमटी, पोळी/भाकरी, कोशिंबीर, चटणी असा चौसोपी विचार केलेला असतो. ह्या रोजच्या स्वयंपाकाची जबाबदारी घरातील ज्या व्यक्तींनी उचललेली असते, त्यांना नित्याचे पदार्थ बनवण्यासाठी किती शिधा, भाजीपाला लागतो ह्याचा अचूक अंदाज करता येत असतो. म्हणजेच त्या मंडळींना घरातील प्रत्येक व्यक्तीच्या भुकेचा अंदाज नक्की असतो. हे कोणी शिकवून येत नाही तर सातत्याने घरातील मंडळीचे निरीक्षण करून तयार झालेले अंदाज असतात. घरातील अंदाजपत्रक तयार करण्यासाठी किती महत्त्वाचा गुण आहे हा! हा गुण जर आपल्या पाल्यांच्या अंगी लहानपणा पासून आपण बाणवला तर ते किती उपयुक्त ठरू शकेल! हे ज्ञान अनुभवातून पक्के होत जाते. ह्या ज्ञानार्जनाची बीजे मात्र लहान वयात पेरावी लागतात
दर वर्षी २५ डिसेंबर म्हणजे नाताळच्या दिवशी आमच्या घरी आम्ही सोसायटी मधील सर्व मुलांच्या Christmas party चे नियोजन करायचो. ही party विशेष अश्यासाठी असायची की त्याचे नियोजन सर्व मुलं मिळून करायची. आम्ही फक्त सल्लागाराच्या भूमिकेत. एकदा menu ठरला की party च्या दिवशी सकाळ पासून सर्व मंडळी कामाला लागायची. Menu मधील पदार्थ सर्व मुलं मिळून करायची. एक वर्षी मुलांनी भरपूर cake केले होते. एक वर्ष मी छोले केले आणि मोठ्या मुलांनी पुऱ्या केल्या, एक वर्ष कच्छी दाबेली. आधी काही वर्ष सामान आम्ही आणून देत असू. नंतर मात्र सर्व मुले मिळून किती सामान लागणार ह्याची चर्चा करून बाजारातून साहित्य घेऊन येत. संध्याकाळी बागेत लावलेले Christmas tree सजवायचे आणि त्या भोवती बसून आपण केलेले पदार्थ खायचे असं ह्या पार्टी चे स्वरूप असे. ह्या निमित्ताने त्यादिवशी घरभर मुलांची धमाल आणि धुडघुस असे. मला नक्की खात्री आहे की ह्या पार्ट्यां मधून प्रत्येक मुलाने काही ना काही धडे घेतले असतील जे तिला किंवा त्याला पुढील आयुष्यात उपयोगात आणता येतील. निदान, पुढील आयुष्यात ह्या मुलांनी घरी कोणाला जेवायला बोलावले तर नियोजन करायचे असते हे तरी नक्कीच त्यांना आठवेल.
मुलांमध्ये जिज्ञासा किंवा कुतूहल निर्माण करण्यासाठी स्वयंपाक हे एक उत्तम आणि उपयुक्त साधन आहे. जेवताना पानात वाढलेले पदार्थ आधी आणि नंतर कसे दिसतात किंवा आधी आणि नंतर चवी मध्ये काय बदल होतो. एखाद्या पदार्थाला अमुक चव कश्यामुळे आली आहे हे ओळखण्याचे बाळ कडू मुलांना लहानपणीच देता येते. जेवताना पानात वाढलेल्या पदार्थांकडे नीट लक्ष देऊन जेवावे म्हणून आम्ही मुलांना एक गंमतीशीर गोष्ट करायला सांगत असू. मुलांचे जेवताना लक्ष नाही असं दिसलं की मी त्यांना एखाद्या पदार्थात काय काय घातले आहे असं ओळखायला सांगत असे. कधी अगदीच थातुर मातुर उत्तरे यायला लागली की मी त्या पदार्था बद्दल काहीतरी विशेष सांगत असे (उदाहरणार्थ हा पदार्थ आंबट करण्यासाठी एक विशिष्ट गोष्ट घातली आहे, ती कोणती ओळखा ). असं आव्हान केल्यावर मुले लक्षपूर्वक आणि चवीने खात. तो विशिष्ट पदार्थ ओळखू आला नाही आणि मी सांगितलं की मग त्या चवीकडे अधिक चौकसपणे लक्ष देऊन खात. ह्या खेळाची उपयुक्तता काही वर्षांनी अनेक प्रसंगातून लक्षात येत गेली. जसं कधी चटणी ची चव दिली की “आई ह्यात चिमूटभर साखर हवी आहे” ; कधी कोकणी वड्याचे पीठ भिजवून चव दिली तर “आई, this needs some smoke”.. कधी tomato rice ची recipe करताना भरमसाट मसाले दिसले तर टोमॅटो आणि मसाले ह्यांना चाट मारून सरळ tomato ketchup वापरून मुलांनी उत्कृष्ट पदार्थ तयार करून समोर ठेवला.
स्वयंपाकापासून तरुण मंडळी दूर जाण्याचे अजून एक कारण मला असं वाटते ते म्हणजे अपयशाची भीती. स्वयंपाक जमला नाही किंवा एखादा प्रयत्न फसला तर आपल्याला बोलणी खावी लागतील किंवा बाकी सर्व जमते, पण स्वयंपाक मात्र आजिबात जमत नाही असे टोमणे ऐकावे लागणे. मला तर वाटते स्वयंपाक हा चुका करत करत शिकण्याची गोष्ट आहे. कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने हातात लाटणे घेतल्या घेतल्या उत्कृष्ट पोळ्या किंवा पुऱ्या केल्याचे आपण कधीही ऐकलेलं नाही. आणि मला वाटतं स्वयंपाक घर ही जगातील सर्वात सुरक्षित प्रयोग शाळा आहे आणि घरातील आपली माणसे त्या प्रयोग शाळेतील गिनी पिग्स.
आपल्याला उत्तम स्वयंपाक करता येतो ह्या माझ्या आत्मविश्वासाला छेद देणारा प्रसंग लग्ना नंतर काहीच दिवसात घडला होता. आपल्या पाककौशल्याने सासूबाईंना चकीत करून त्यांची शाबासकी मिळवण्याच्या हेतूने एक दिवस त्या घरी नसताना मी गोडाचा शिरा करण्याचा “घाट” घातला. “शिरा काय सोपा तर आहे. आईला कधीही शिरा कर असं म्हटलं की दहा मिनिटात गरम गरम शिरा हजर होतो की” असा निरागस विचार करून शिरा करायला घेतला मात्र आणि ब्रह्मांड आठवलं. कधी पाणी जास्त झालं म्हणून रवा वाढवत होते तर कधी रवा जास्त झाला म्हणून पाणी. असं करता करता जवळ जवळ किलोभर रवा आणि साखर ह्यांची आहुती माझ्या शिऱ्यात पडली होती. शेवटी घरातला रवा संपल्यावर माझ्या प्रयोगाला विराम मिळाला. माझे कौशल्य पाहून सासूबाई चकितच काय पण “थक्क” च्या पलीकडे जाऊन पोचल्या होत्या. पुढचे काही दिवस माझ्या पाक कौशल्याची चेष्टा मस्करी करत हसत खेळत पार पडले. पण हा अनुभव माझ्यासाठी अतीव मोलाचा ठरला. फसलेल्या शिऱ्याच्या अनुभवाने न डगमगता मी स्वयंपाक मजल दर मजल करत आत्मसात करत गेले.
स्वयंपाकाचा वारसा जपला नाही तर तो लोप पावतो, ह्याची मी बघितलेली अनेक उदाहरणे आहेत. दर वर्षी होळीला पुरण पोळी खाऊन झाली की शेखर न चुकता त्याच्या कुसुम आजीची आठवण काढतोच. “पोळी चांगली झाली आहे, पण पारी काही कुसुम आजी करायची तशी जमली नाहीये”. शेवटी एक वर्षी मी म्हणाले, “अरे मी कुसुम आजीच्या हातची पुरणपोळी खाल्लीच नाहीये, तर मला कसं कळणार?”. हा नित्याचा संवाद झाला की मला नेहमी वाटत राहतं की कुसुम आजी ने तिची पाककृती लिहून का ठेवली नाही. किंवा तिच्या लेकी, सूना, नात सुनांना का शिकवले नाही. किंवा लेकी, सूना, नात सुनांनी का तिच्याकडून पुरणपोळी शिकून घेतली नाही? ह्या सगळ्यात एक उत्कृष्ट पुरणपोळीची पाककृती नाहीशी मात्र झाली!
रोजच्या धकाधकीत क्वचित नाही जमलं, थोडा बदल म्हणून बाहेरून काही तयार घेऊन यायला हरकत नाही. सोय म्हणून स्वयंपाकाला बाई लावणे ते सुद्धा अगदीच चालेल. पण तिला आपल्या पद्धतीचे शिकवण्याची तिच्या कडून तसे करून घेण्याची जबाबदारी आपलीच आहे. बाहेर थालीपीठाची भाजणी विकत मिळते आणि उत्तम थालीपीठे होतात मग घरी कशाला ते धान्य भाजत बसायचे, असा विचार नसावा. आपल्या कुटुंबात परंपरेने चालत आलेली प्रमाणे, पाककृती आवर्जून जपाव्यात.

प्रत्येक कुटुंबातील काही ठेवणीतील पारंपारीक पदार्थ नक्की शिकून घेऊन आत्मसात करावेत आणि मुलांना आवर्जून खायला घालावेत. कुटुंबातील मागच्या पिढीशी दुवा साधण्याचा स्वयंपाक हा एक उत्तम मार्ग आहे. स्वयंपाकाचा वारसा आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायची जबाबदारी जशी वर्तमान पिढीची आहे, तशीच तो वारसा ग्रहण करायची जबाबदारी पुढच्या पिढीची ही आहे. ही देवाण घेवाण झाली तरच स्वयंपाकाचा वारसा अखंडित राहील.

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
२०-ऑगस्ट-२०२३
Very nicely written Shivangi, we can visualise your recipes. Wishing to read again and again 👌👌
LikeLiked by 1 person
Very well expressed thoughts in shuddh Marathi!!
LikeLiked by 1 person