गच्चीवरील बाग

हा लेख लिहिण्यामागे माझा कोणाही व्यक्तीला दुखवायचा हेतू नाही. पण गेल्या काही वर्षांपासूनच्या माझ्या पर्यावरणीय प्रवासात मला जे उमगत गेले आणि माझ्या विचारांमध्ये जे बदल होत गेले ते इकडे व्यक्त करते आहे.

माझ्या बालपणीचा खूप मोठा काळ पुण्यात व्यतीत झाला. सदनिकेत राहत असून सुद्धा आजूबाजूला बाग लावणे किंवा असणे हे भाग्य मला लाभले. त्या नंतर जवळ जवळ पंधरा वर्ष माझी आणि बागेची ताटातूट झाली. परत स्वतःच्या घरा भोवती बाग लावली ती landscape artist ने design करून दिलेली होती. Landscape artist ने design केलेली बाग सुरवातीची काही वर्षे आम्ही उभयतांनी राबून देखरेख करायचा प्रयत्न केला. शहरातील नीटनेटक्या बागा बघीतल्या, की आम्हाला जाणवायचं की त्या नीटनेटक्या ठेवण्यासाठी किती मनुष्यबळ खर्ची पडत असेल. अजून एक गोष्ट जाणवली की बाग ही कायम बदलत राहणारी जागा आहे… फक्त आणि फक्त बळजबरीने ती आहे तशी अभंग ठेवता येते.

घराभोवती असलेली बाग आणि गच्चीवरील बागेतील तयार वाफे

आम्हाला हळूहळू ह्या बळजबरीचा कंटाळा येऊ लागला आणि आम्ही आमच्या पद्धतीने बाग “सजवू” लागलो. त्या साठी विविध साहित्य, अवजारे  बागेत येऊ लागली. रस्त्याकडेला मिळणाऱ्या आणि आवडलेल्या फुलझाडांपासून सुरुवात झाली. त्यानंतर व्यावसायिक रोपवाटिकेचा शोध लागला.  प्रत्येकवेळी रोपवाटिकेमध्ये गेलो की एखादे नवीन झाड आम्हाला खूणावी आणि आम्ही ते विकत आणून आमच्या बागेत प्रस्थापित करत असू. बागेत झाडांची गर्दी होत होती आणि आम्हाला सुद्धा हळू हळू झाडांचे अंतरंग उमगत गेले

हळू हळू झाडे, वनस्पती ह्या मध्ये आपले-परके म्हणजेच देशी वनस्पती आणि विदेशी वनस्पती ह्याची माहिती मिळत गेली आणि आम्ही कटाक्षाने विदेशी झाडे अथवा वनस्पती विकत आणायचं बंद केलं. नंतर नंतर मुद्दाम रोपवाटिकेमध्ये जायचे सुद्धा बंद केलं.

बागेत आलेली विविध फुले

आता आपली बाग आहे तर भाजी पाला वाढवून आपल्या बागेतली ताजी ताजी भाजी घ्यायची ठरवलं. त्याचे निष्फळ प्रयत्न काही वर्ष झाले. अपुऱ्या उन्हामुळे काहीच नीट वाढेना. बागेतली झाडे वाढत होतीच आणि त्याबरोबर सावली सुद्धा वाढत होती. माझ्यातल्या निसर्ग प्रेमी शेतकऱ्याने उन्हाच्या शोधात गच्चीवर स्थलांतर केले. गच्चीवर देखील पत्रे टाकलेले होते, त्यामुळे काही ठराविक ठिकाणीच ऊन यायचे. त्या जागा मी कुंड्यांनी भरून टाकल्या. वांगी, मिरची, पालेभाज्या, अननस, विड्याच्या पानांचा वेल अशी माफक लागवड केली.

बागेने दिलेली फळे आणि भाजी पाला

साधारण दोन वर्षांपूर्वी घरावर नवीन मजला वाढवला. त्यामुळे आम्हाला नवीन गच्ची मिळाली आणि त्याबरोबर गच्चीवरील बाग नव्याने विकसित करायची संधी सुद्धा मिळाली. गच्चीवरील बागेतून आपल्या भाजीपाल्याच्या रोजच्या  गरजा भागणार नाहीत ह्याचा अंदाज होता. म्हणून गच्चीवरील बागेचा अजून कुठल्या प्रकारे उपयोग करता येईल ह्याचा विचार करू लागलो. योगायोगाने देशी बीज संवर्धनाबद्दल माहिती मिळाली आणि त्या मध्ये कार्यरत असलेल्या काही लोकांच्या संपर्कात आलो. 

विविध गटांमध्ये प्रवेश केला आणि आमची थोडी निराशा झाली. आमची अपेक्षा साधारण अशी होती की ह्या गटांमधील सदस्य हे निसर्ग प्रेमी असतील, इतर चारचौघांपेक्षा थोडे सहिष्णू  असतील. पण हळू हळू जाणवत गेलं की त्यांनी लावलेल्या बागेत त्यांना इतर कुठल्याही किड्यामुंगीचा शिरकाव झालेला खपत नाही. पाना फुलावर काही वेगळं दिसलं की लगेच त्याची चर्चा आणि त्यावर जीवघेण्या उपायांची देवाण घेवाण सुरु होते! बरं बहुतेक मंडळींनी जगावेगळे उपक्रम जशी “सावंत आजींची बाग” बघितलेले असतात, त्यावर चर्चा करून “विलक्षण”, “”संपन्न करणारा अनुभव” असे अभिप्राय दिलेले असतात. पण प्रत्यक्षात मात्र हे सर्व बासनात गुंडाळून ठेऊन देतात! मुळात देशी बीज संवर्धन करणे म्हणजे कुठल्याही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक उपायांशिवाय (कीटकनाशके इत्यादी) जे बीज उत्पन्न होईल त्याचा प्रसार करणे. पण, जर आपण विविध उपाय करत राहिलो तर त्या बीजांमधील निसर्गदत्त ताकदीचा त्यांना विसर पडेल की काय अशी भीती वाटते.

वास्तविक आपण शहरी शेतकरी/माळी आहोत. आपल्या मर्यादित जागेत आपण खूप काही पिकवू शकणार नाही. आपल्या छोट्याश्या बागेतून मिळणारा भाजीपाला हा प्रत्येक वेळी आपल्या कुटुंबाला पुरेसा असेलच असे नाही. म्हणजेच, आपल्या बागेतील उत्पन्नावर आपली उपजीविका अवलंबून नाही. ही आपली हौस, आवड आणि काही मर्यादित प्रमाणात आपल्याला ताजा भाजीपाला मिळवून देणारी अशी जागा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 

सुदैवाने आमच्या बागकामाच्या सुरुवातीच्या काळात आमच्या हाती श्रीकांत इंगळहळीकर ह्यांनी लिहिलेले “आसमंत” हे पुस्तक लागलं. त्यातील “जिवाभावाचा बहावा” हे प्रकरण आमच्यावर विशेष परिणाम करून गेलं. त्या लेखातील त्यांचा अनुभव वाचून असे लक्षात आले, की आपण जेंव्हा एखादे झाड लावतो, आपल्याला फक्त त्याच्याकडून फुले किंवा फळांची अपेक्षा असते. म्हणजे झाड हे आपल्याला सुंदर दिसणारी, सुगंधी फुले किंवा मधुर फळे देणारे एक “यंत्र” आहे. त्याला खत घातलं, पाणी घातलं की त्यानं त्याचं काम केलेच पाहिजे अशी सर्व साधारण शहरी विचारसरणी असते. आपण झाडा कडे service provider ह्या दृष्टीने बघतो. त्याला वाढवले आहे, खत-पाणी दिले आहे, आता त्यानं आपल्याला सावली, फुले, फळे दिलीच पाहिजे. एखाद्या झाडाची आपल्याला अपेक्षित प्रगती झाली नाही, तर ते तोडून टाकायला सुद्धा आपण मागे पुढे बघत नाही.

शास्त्रज्ञ असं सांगतात, की पृथ्वी वरून माणूस वजा केला, तर पृथ्वीचे काहीच बिघडणार नाही; परंतु पृथ्वीवरून जर कीटकांना वजा केले, तर मनुष्य जाती ३-४ वर्षात नामशेष होईल. माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवण्या मध्ये कीटकांचा किती मोठा वाटा आहे हे  ह्यावरून स्पष्ट होतं. पण जिथे आपण आपल्या आवडत्या झाडाची गय करत नाही,  तिथे त्यावर पोसल्या जाणाऱ्या इतर जिवांना विचारते कोण? एखादा किडा, आळी, कोळी पटकन मारून टाकायला आपला हात क्षणभर ही थबकत नाही. पण एखादे झाड जोपासताना, त्याचे बारीक निरीक्षण करून त्यावर कोणत्या जीव जंतूंची हालचाल होत आहे, त्याचे काय कारण आहे, तो जीव न मारता आपण झाडाची जोपासना करू शकतो का? असे विचार क्वचितच करतो.

आमच्या बागेत आता अनेक वर्ष कोणत्याही प्रकारची कीटकनाशके, रासायनिक खतं ह्याचा वापर कटाक्षाने टाळलेला आहे. असं म्हणा ना, की आमची बाग आता आमची राहिली नाही. सिमेंट च्या जंगलात, कोणत्याही वेळी कुठल्याही जीवाला तिकडे बिनधोक राहता येईल असे ठिकाण तयार झाले आहे. परिणामी, बागेत अनेक प्रकारचे जीव जंतू आहेत, पण कुठल्याही एका कीटकाचा उपद्रव होत नाही. कारण, त्या कीटकांवर पोसली जाणारी अन्नसाखळी कालांतराने तयार झाली आहे. बागेत अजून ही भरपूर भाजी पाला मिळतोच असं नाही, पण कुठल्याही वेळी, बाग जिवंत आणि चैतन्यमय असते काही विशेष कष्ट न घेता!

बागेला भेट देणारे कीटक आणि इतर जनावरं

“आसमंत” मधील बहाव्याच्या लेखाने आम्हाला बागेकडे बघायची वेगळी दृष्टी दिली…झाडाकडे  एकाकी दृष्टी ने न बघता त्याच्या आसमंतातील स्थाना कडे बघावे ही दृष्टी दिली…झाड परिपक्व होऊन बहरायच्या कितीतरी आधीपासून ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आनंद देऊ शकतो, फक्त आपण संयम ठेऊन ते आनंदाचे क्षण शोधण्याची गरज असते.

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
२८-नोव्हेंबर-२०२०

8 thoughts on “गच्चीवरील बाग

  1. छान लिहिले आहेस
    सगळ्यांनी आसमंत वाचून दृष्टी बदलली पाहिजे तरच वेगळा
    आनंद मिळवता येईल

    Like

  2. Thoughtfully conceived idea of preserving habitat for all neglected but very important member of our ecosystem i.e.insects/bugs/ worms etc.
    Gardening/farming can be taken up as a hobby but being responsible for preserving ecosystem while doing so is a commitment towards nature and you both are consciously trying to reedem it….congrats to both of you!!👍

    Like

  3. फारच छान!! लेखामध्ये मांडलेला विचार खरंच खूप महत्वाचा आहे, फक्त आपला विचार न करता सर्व जीवांचा विचार करायलाच हवा… एक अती प्रगत जीव म्हणून ती आपली जबाबदारी आहे. बाग, शेती अनेक जण करतात, जबाबदार संगोपन जेवढे जास्त जण करतील तेवढं उत्तम!

    Like

  4. Madam ur article jis very nice. Specially the para about insects is very good. Our approach towards them is still hostile. And it needs to change.
    Overall article is very nice.

    Like

  5. *’Tech’राणी ते ‘वन’राणी*
    ‘Tech’राणी ते ‘वन’राणी असा तुझा प्रवास
    एका अनोख्या उपक्रमाचा घेतलास तू ध्यास

    वसुंधरा पुनश्च पुलकित करण्याचा तुझा प्रयास
    ज्याने खचितच मंदावला पर्यावरणाचा ऱ्हास

    सान्निध्यातील वन्यजीवांनाही मिळाला मोकळा श्वास
    साथीदाराचीही लाभली अखंड खंबीर साथ व सहवास

    ठरवलं की शक्य होतं हे सत्य आहे नाही आभास
    पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा देतो खास

    —-सिद्धेश

    Liked by 1 person

Leave a reply to Sheetal Cancel reply