मुक्काम पोस्ट मुचरी

Mukkam2

पार्श्वभूमी

मुक्काम पोस्ट मुचरी ची सुरुवात नेमकी कुठे झाली हे शोधण्याकरता आपल्याला थेट आमचे लग्न ठरले त्या काळात जावे लागेल. लग्न ठरल्या पासून होई पर्यंत आम्ही दोघे रोज भेटायचो आणि बऱ्याच गप्पा मारायचो. अर्थात लग्न ठरल्यावर बाकी लोक काही वेगळे करत नाहीत. पण बोलता बोलता एक दिवस माझा भावी नवरा शेखर म्हणाला की “मला बंगल्यात राहायला खूप आवडते”. मी चमकले, कारण मलाही बंगला आणि भवतालच्या बागेची खूप आवड होती (अजून हि आहेच). त्या वेळी दोघांनी ठरवून टाकले की जेंव्हा आणि जसे जमेल तशी ही आवड पूर्ण करायची. त्या प्रमाणे आमचे बंगल्याचे चे स्वप्न “झुळूक” च्या रूपाने २००४ मध्ये साकार झाले.

दरम्यानच्या काळात १९९७ च्या मे महिन्यात आम्ही शेखर च्या काकू कडे नेवरे येथील त्यांच्या घरी गेलो. तिकडे काकूंच्या च्या आई-वडिलांचे जुने मातीचे घर होते. त्यांनी लावलेल्या आंब्याच्या बागा आणि मे महिना असल्यामुळे तिकडे आंब्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आलेले त्यांचे ३०-४० नातलग असा विस्तृत पसारा बघायला, अनुभवायला मिळाला. आम्हाला जे दिसले, भावले ते म्हणजे तिथली शांतता, शुद्ध हवा, आणि गावा कडची माणसे… काकूंच्या घरात एकाच वेळी ३०-४० लोक असून सुद्धा कुठल्याही प्रकारचा गोंधळ, गडबड काहीही नव्हते. त्या वेळी काकूंची आई पण तिकडे होती. त्यांचा प्रेमळ दरारा सुद्धा जाणवला. मुख्य म्हणजे त्या एका घरात इतके विविध उपक्रम एकाच वेळी चालू होते, की ते बघून आम्ही थक्क झालो होतो. उदाहरण द्यायचे झाले तर, सकाळी ५:३०-६:०० ला उठल्या पासून साधारण ८:००-९:०० वाजेपर्यंत चहा, कॉफी करणे अविरत चालू होते. त्याच बरोबर, नाष्ट्या साठी म्हणून अटवल भात चुलीवर चढवलेला असे. एकी कडे दुपारच्या जेवणाचा बेत आखला जात असे. भात तयार झाला की आधी पुरुष मंडळी आणि लहान मुले नाश्ता करून घ्यायचे. पुरुष मंडळी आंब्याच्या बागेत आंबे तोडायला निघून जायचे आणि मुले खेळायला. नंतर सर्व बायका मिळून नाश्ता करायच्या आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायच्या. भाजीचा फणस कापून चिरून ठेवणे, आंबे फोडी करून ठेवणे किंवा रस काढून ठेवणे, आमटी, भात, चटणी, पोळ्या अशी चारी ठाव तयारी सुरु असायची. तोवर वाडीतली गडी माणसे येऊन त्यांचे काम सुरु करायचे. ती कामे म्हणजे आमसुले करणे, कोकम सरबत करणे, फणसाचे तळलेले गरे करणे, आंबा पोळी, फणस पोळी करणे, खळे सारवणे, कोकमाच्या झाडा वरून कोकमे खाली उतरवणे अश्या स्वरूपाची अनेक कामे चालू असायची.

दुपारी जेवणाच्या सुमारास सर्व पुरुष मंडळी सकाळच्या फेरीतील कामे उरकून घरी परतायची. मग ते आणि सर्व लहान मुले मिळून विहिरीवर पंप लावून अंघोळ करायचे! दुपारी सुग्रास जेवणा बरोबर कोकणी मेव्याचा प्रसाद, म्हणजे भरपूर आंब्याच्या फोडी आणि रस, फणसाचे गारे, कैरी किंवा आंब्याचे लोणचे असे. जेवणे झाली की जागा मिळेल तिकडे सतरंज्या टाकून सर्वजण पटापट आडवी होत कारण लगेच दुपारच्या फेरीची कामे सुरु करायची असत. संध्याकाळी मंडळी परतली की चहा व्यतिरिक्त कोकम चे ताजे सरबत, कैरी चे पन्हे, कोकम फळाच्या गराचे पन्हे, काजू च्या बोंडांचे सरबत आणि कधी कधी काकूंनी केलेले फणसाचे सांदण ही असे! संध्याकाळी मुलांबरोबर काही उत्साही मोठी मंडळी क्रिकेट, आंधळी कोशिंबीर इत्यादी खेळ खेळण्यात रंगून जायची. रात्री मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर भाकरी, झुणका, वांग्याची भाजी असा साधा पण रुचकर बेत असायचा. रात्री सर्व जण पुढच्या अंगणात गाद्या घालून झोपायचे. भर मे महिन्यात सुद्धा रात्री कुडकुडून जीव जाईल की काय इतकी थंडी असायची. पंखा, AC ची जरूरच नाही.

नेवऱ्याच्या मुक्कामात अगदी आदर्श गोकुळ म्हणावे असे तीस-चाळीस व्यक्तींचे आनंदाने एकत्र नांदणारे घर बघायला मिळाले. नेवरे मधील आमचा मुक्काम अविस्मरणीय झाला. असे भरले घर बघून आम्ही दोघेही खूपच भारावून गेलो….वाटून गेले, आपल्याला असे काही उभे करता येऊ शकेल का?

Mukkam3

शोध मोहीम
१९९७-२००४ ही वर्षे आमची पुण्यात घर शोधणे, बांगला बांधणे ह्या कामात गेली. त्या नंतर परत जेंव्हा गुंतवणुकीचे विचार सुरु झाले तेंव्हा काय करायचे असा प्रश्न पडला. पुण्यात आजून एक फ्लॅट घ्यावा का असे जेंव्हा शेखर ने विचारले, तेंव्हा माझा साफ नकार होता. मुळात फ्लॅट गुंतवणूक म्हणून घेणे ही संकल्पना मला मान्य नव्हती आणि नाही. मग काय करायचे म्हणून आमच्या दोघांच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली. नेवरे आजून मनात घर करून होतेच. त्या मुळे आम्ही आपसूक जमीन विकत घ्यावी ह्या विचारा पर्यंत येऊन पोहोचलो.

सुरुवातीला पुण्याच्या आसपास काही जमते आहे का ते बघायला सुरुवात केली. त्यातून शेखर चा स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट करायची ठरली की त्या विषयाच्या खूप खोलात जाऊन त्याची पूर्ण चिरफाड केल्या शिवाय त्याला चैन पडत नाही. अगदी झपाटल्या प्रमाणे तो वागू लागतो. आळस, चालढकल मुळीच खपत नाही. मग अगदी पेपर मधील छोट्या जाहिरातींपासून ते एजन्ट ना भेटून चर्चा करणे, ह्या सर्व गोष्टी त्याने केल्या. ह्या सर्वा अंती एक-दोन जमिनींची माहिती मिळायची. मग शनिवार, रविवार आम्ही दोघे ती बघायला जायचो.

शेखरच्या अभ्यासा मुळे जमीन घेण्यातले बारकावे समजायला लागले. एक वर्षभर इकडे तिकडे फिरल्यावर शेखर ने एक दिवस मला विचारले की जमीन आपण नक्की कश्यासाठी घेणार आहोत. आपल्याला त्या जमिनीत काय करायचे आहे? फलोत्पादन करायचे आहे का? तर मग तळेगाव च्या आसपास जमिनी बघितल्या पाहिजेत. शेती करायची आहे का? तर मग पुण्याबाहेर जावे लागेल साधारण भोर, बनेश्वर च्या आसपास वगैरे वगैरे.

त्या वेळी मी एक मोघम स्वप्न (इंग्रजी मध्ये त्याला Vision असे म्हणता येईल) सांगितले. म्हणाले मला आपल्या भविष्यात (उतार वयात) असे व्हायला आवडेल की आपण आपल्या गावातल्या घरात राहत आहोत, बाहेर धो धो पाऊस पडत आहे, आपला सहकारी (तूर्तास त्याला आपण विठू म्हणू) आपल्या शेतात काम करून परतला आहे, आपण दोघे बाहेर पडवीत झोपाळ्यावर बसलो आहोत, त्याची बायको (रखमा) स्वयंपाक घरात काही काम करते आहे आणि मी तिला आवाज देते, “रखमा, विठू आला गं! चहा टाक बघू सगळ्यांना…” बस इतकंच….

२०१० मध्ये आम्हा नातलगांची सहल कोकणात दापोली ला गेली होती. तिकडे जाण्याआधी शेखर ने दापोली मधील एजंट चे फोन नंबर वगैरे मिळत आहेत का ते बघून ठेवले. छोट्या जाहिरातीं मधून दापोली परिसरातली एक दोन जमीन मालकांशी फोन वर चर्चा करून तिकडे आलो की भेटू असे ठरवून टाकले. दापोली च्या मुक्कामात काही विशेष हाती लागले नाही. पण आमच्या शोधला दिशा मिळाली. नक्की ठरले कि जमीन कोकणातच घ्यायची.

मग पुण्यापासून जितके जवळ तितके चांगले असा विचार करून आम्ही कोकण शोध मोहीम सुरु केली. सुरवात खुद्द दापोली पासून केली. बरेचसे शनिवार आणि रविवार दापोली ला जाऊन जमिनी बघणे असा कार्यक्रम सुरु झाला. दापोली ला अनेक फेऱ्या झाल्या आणि चक्क दापोली चा कंटाळा आला. पुणे-मुंबईला बऱ्यापैकी जवळ असल्या मुळे दापोली ला पर्यटकांची फारच गर्दी झाली आहे आणि ती उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. मग दापोली व्यतिरिक्त कुठे जमीन मिळते आहे का ते बघू लागलो. दापोली च्या फेऱ्यांचा एक उपयोग असा झाला कि बऱ्याच एजन्ट लोकांबरोबर आमच्या ओळखी झाल्या. त्या मुळे ते आमच्याशी संपर्क साधून जमिनीची माहिती देत आणि आम्ही शनिवार-रविवार ठरवून ती बघायला जात. दापोली नंतर आमच्या केळशीला अनेक फेऱ्या झाल्या. पण काही जमेना, आवडे ना.

२०११ मध्ये मी कामा निम्मित काही आठवडे थायलंड ला गेले होते. निघायच्या दिवशी शेखर ला फोन केला तेंव्हा कळले कि तो शनिवारी कोकणात जमीन बघायला जाणार आहे. मी शनिवारी पहाटेच पोचणार होते, त्या मुळे मला घेऊन जाणार नाही असे त्याने ठरवून टाकले होते केले होते. मी मात्र ठरवले होते की काहीही झाले तरी आपण जायचे. सकाळी ६:०० ला घरी पोहोचले, बॅगा तश्याच टाकल्या, अंघोळ, चहा उरकला आणि उशी पांघरूण घेऊन गाडीत बसले.

Mukkam4

आरवली गावाजवळ एक जमीन कळली होती. ती जाऊन बघितली. ती काही विशेष पटली नाही. पण तिकडे जवळच एक एजंट कळला होता. त्यांच्या कडे गेलो जेवण, गप्पा झाल्या. त्यांनी सांगितले की वेळ असेल तर आजून एक जागा तुम्हाला दाखवतो. संध्याकाळी ४:०० च्या सुमारास मुचरीला पोहोचलो आणि संबंधित जमीन मालकांना घेऊन जमीन बघायला गेलो. मुचरी मधील हे रान आम्हाला विशेष आवडले. पसंती कळवून आम्ही पुण्याला परतलो.

त्याच सुमारास केळशी मध्ये वर्तक म्हणून एक कुटुंब होते ज्यांना त्यांची आंब्याची बाग विकायची होती. ती सुद्धा आम्हाला पसंत होती. मग बरीच चर्चा केल्यावर आम्ही मुचरी हे ठिकाण ठरवून टाकले.

मुक्काम

मुचरी मध्ये २५ एकर सलग रान विकायचे होते. आधी एजन्ट करवी काही होते का ते बघण्यात जवळ जवळ एक वर्ष निघून गेले. नंतर आम्ही सूत्र हातात घेतली. एक दिवस पुण्याहून निघून थेट मुचरी ला पोहोचलो आणि जमीन मालकांना भेटलो. त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले आणि पुढील वर्ष सव्वा वर्ष पाठपुरावा केला.

पाठपुरावा हा कधी फोन वरून, कधी तिकडे जाऊन त्यांच्या बरोबर चर्चा करणे, अडचणी समजून घेणे, त्यातून मार्ग काढणे असे अविरत चालू ठेवला. ह्या दरम्यान २५ एकर तुकड्याला लागून ३-३ एकर चे सलग तुकडे पण वाडीतील दोघांना विकायचे होते. ते आम्हीच विकत घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. असे लक्षात आले कि गावातील लोकांना एखादी गोष्ट घडवून कशी आणायची हे बरेचदा समाजात नाही. मग शेखर ने बराच खटाटोप करून शेवटी मार्च २०१३ मध्ये आमचे मुचरी येथील ३१ एकर रानाचे खरेदीखत झाले.

ऑगस्ट २०१३ मध्ये आम्ही पावनखिंड ला गेलो होतो. त्यावेळी पावनखिंड रिसॉर्ट चे मालक श्री. शिरगावकर ह्यांच्याशी मी गप्पा मारत होते. त्या सुमारास माझ्या बहिणीचा फार्महाऊस बांधण्याचा विचार चालू होता आणि कुठल्या पद्धतीचे फार्महाऊस बांधायचे ह्या संदर्भात आम्ही विचार करत होतो. मातीचे बांधावे का RCC चे ह्या बाबत शिरगावकरांचा अनुभव काय आहे हे जाणून घायचे होते. मी शिरगावकरांना सहज सांगितले की आम्ही अशी अशी जमीन विकत घेण्याचा विचार करत आहोत. तुमचा अनुभव काय आहे ह्या बाबतीत. त्यांनी सांगितले कि कुठली ही गोष्ट घेणे हे सगळ्यात सोपे आहे. अवघड कामे त्यानंतर सुरु होतात. त्याची तुमची तयारी कितपत आणि काय आहे ह्याचा विचार केला आहे का?

आणि खरंच ह्याचा विचार आम्ही केला नव्हता. लोकांना सांगितले की कोकणात जमीन घेतली आहे, की त्यांचा पुढचा प्रश्न तयार असे, “आता त्याचे काय करणार? असे करा, सरळ आंबे आणि काजू लावा. चांगले उत्पन्न मिळेल” काहींनी असा ही सल्ला दिला की “प्लॉट पडून मस्त डेव्हलोप करा आणि प्लॉट्स विकायला काढा”.

एक सत्य जे सर्व जण सांगत होते ते असे की कोकणात कामाला माणसे मिळत नाहीत. मग आपण नक्की काय करू शकतो ह्या जमिनीचे, अश्या विचाराने आम्हाला भंडावून सोडले. त्यात एक दिवस सकाळी माझ्या बाबांनी फोन करून सांगितले की अतुल कुलकर्णी ची झी २४ तास वर मुलाखत लागली आहे. त्याने पण तुमच्या सारखी जमीन घेतली आहे आणि तो तिकडे वेगळे प्रयोग करतो आहे. मी धावत पळत जाऊन TV चालू केले. अतुल कुलकर्णी ची मुलाखत बघून आमच्या विचारांना नवी दिशा मिळाली….….

आढावा आणि पुढील आराखडा

अतुल आणि गीतांजली कुलकर्णी ह्यांनी साताऱ्या जवळ २४ एकर जमीन घेतली आहे. २००६ पासून ते त्यावर पर्यावरणीय विकास करत आहेत. त्यांचा उद्देश हाच आहे की त्यावर जंगल तयार करायचे आणि भविष्यात तो जमिनीचा तुकडा निसर्गाच्या स्वाधीन करायचा. अतुल कुलकर्णी ह्यांनी सांगितलेला एक विचार मनाला अतिशय भावला, तो म्हणजे ज्यांना शेतीचे उत्पन्न घर चालवण्यासाठी लागत नाही पण जमीन आहे अश्या सर्व व्यक्तींनी निसर्ग संवर्धन केले तर भरपूर काम उभे राहू शकते.

त्या मुलाखतीतून मला बरेच संकेत मिळत गेले. मुख्य म्हणजे दोन संस्थांची माहिती मिळाली एक म्हणजे Ecological Society, पुणे आणि Oikos for Ecological services. Ecological Society मधील अभ्यासक्रमाची ची माहिती मिळाली (Sustainable Development of Natural Resources and Nature Conservation). मला स्वतःला तो अभ्यासक्रम करावा असे वाटले. शेखर ने सुद्धा हे काम (म्हणजे लोकांची बडबड ऐकणे) माझ्या वर सोपवले. ह्या अभ्यासक्रमामधील व्याख्याने मी जीवाचे कान करून ऐकायची आणि घरी येऊन काय शिकले ते शेखर सांगायची. Oikos ला आमच्या प्रकल्पाचा अहवाल करायचे काम सोपवले. त्यानुसार एक दिशा ठरली कि रानात जैव विविधता (Bio-diversity) वाढवायची.

२०१३-१४ ह्या वर्षां मध्ये आम्ही मुचरी ला बऱ्यचवेळा जा ये केली. देवरुख ला हॉटेल मध्ये राहायचे, मुचरी ला जाऊन यायचे, रविवारी पुण्याला परतायचे. आम्ही घेतलेली जमीन ही वस्ती पासून १५-२० मिनिटांच्या अंतरावर आहे. तिकडे घर बांधणें शक्य नाही. मग आम्ही वाडीतच घरासाठी जागा हवी आहे असे गावात सगळ्यांना सांगून ठेवले.

ऑक्टोबर २०१३ मध्ये त्या साठी जागा मिळाली आणि लगोलग आम्ही ती खरेदी करून टाकली. घर बांधायचे ठरवले. त्याच्या भूमी पूजनाला फाटक गुरुजींच्या पत्नी आल्या होत्या. त्यांना सगळे लोक पाणीवाल्या बाई म्हणून ओळखतात. त्यांनी जमिनीवर एके ठिकाणी पाणी लागेल असे सांगितले. आयत्यावेळी विहीर खणायची असे ही ठरवून टाकले. गावात आल्यापासून आम्ही एक धोरण ठरवले आहे. गावातील लोकांच्या ज्या समजुती असतील त्या ताश्याच्या तश्या स्वीकारायच्या. त्यांना आव्हान करायचे नाही किंवा त्यांना शहाणपण शिकवायला जायचे नाही. त्यावर आपण विश्वास किती ठेवायचा हे आपले आपण ठरवयचे. विहीर खणायचा निर्णय घेतला तेंव्हा आमचे आम्ही ठरवले की पाणी लागले तर उत्तम, नाहीतर जे पैसे खर्च होतली ते आपले नव्हते असे समजायचे आणि विसरून जायचे. पण तशी वेळ आली नाही आणि २७ मे २०१४ ला विहिरीला पाणी लागले!!

Mukkam1

घर तयार होता होता घरा जवळ आजून एक जमीन विकायची होती. ती सुद्धा आम्ही घेऊन त्यावर जून २०१५ पासून विविध झाडे लावायला सुरुवात केली. आता त्या जमिनीच्या तुकड्यावर १०० हुन अधिक झाडे, झुडपे लावली आणि जगवली आहेत. २०१८ च्या पावसाळ्यात कदाचित शेवटची झाडे लावू. मग त्या छोट्या जमिनीची आणि झाडांची फक्त निगा राखणे एवढेच काम कायमचे करत राहायचे आहे. त्याच बरोबर घरा भवताली सुद्धा बरीच झाडे लावली आहेत आणि ह्या पुढे ही लावणार आहोत जेणेकरून घनदाट वनराई मध्ये घर वसलेले असेल..

Mukkam5

ह्या व्यतिरिक्त Applied Environmental Research Foundation (AERF) म्हणून एक संस्था आहे जी गेली २-३ वर्षे आम्हाला विविध प्रकारची जंगलात लावण्याजोगी झाडे आणि वेलींची रोपे पुरवते. पावसाळ्याच्या सुरवातीला कोकणातील विशेष झाडे ज्यांचा आता कोकणातील लोकांना सुद्धा विसर पडला आहे, अशी रोपे पुण्यातील “प्रांजल” नर्सरी मधून घेऊन जातो. सध्या च्या गणतीनुसार आम्ही २०-२५ प्रकारची नवीन झाडे नेऊन लावली आहेत जी पूर्वी होती पण आता शिल्लक नाहीत, किंवा जी तिकडे निसर्गतः असायला हवी, पण माणसाच्या आंबे आणि काजू च्या वेडा पायी नाहीशी झाली आहेत. त्यातील काही जगतात, काही जगात नाहीत. त्यांची पुन्हा पुन्हा लागवड करावी लागते.

Mukkam6

कोकणात कोणती झाडे लावायची ह्याचा विचार अविरत करावा लागतो. त्यासाठी पुण्यात फिरताना एखादे झाड दिसले किंवा बिया सापडल्या तर त्याची माहिती गोळा करायची, बिया पेरून त्याची रोपे तयार करायची आणि ती  कोकणात नेऊन लावायची हा मला आता छंदच जडला आहे. २०१६ मध्ये विश्वास लायब्ररी च्या देशपांडे काकांकडून बेलाची फळे मिळाली होती. त्याच्या बियांपासून केलेली २-३ रोपे गेल्यावर्षी लावली आहेत. त्या पैकी एक चांगले फूट दीड फूट वाढले आहे. अशी तयार करून मग लावलेली रोपे छान ताग धरून वाढताना बघितले की खूप समाधान मिळते. बीजा पासून वृक्ष कडे जाणारा हा प्रवास खूप आनंद देणारा आहे.

मला अनेक जण विचारतात की अमुक अमुक झाडाचा माणसाला काय उपयोग? जेंव्हा मी पहिल्यांदा “पारजांभूळ” नावाचे झाड घराच्या आवारात आणून लावले होते तेंव्हा मी सुद्धा Oikos च्या मानसी करंदीकर ला हाच प्रश्न विचारला होता. तिने तेंव्हा इतकेच सांगितले की वन रचनेतील (Forest composition)  एक महत्वाचे झाड आहे म्हणून. तेंव्हा मी फार खोलात शिरायचा प्रयत्न केला नाही. तेवढ्यावर सोडून दिले. कालांतराने विचार करता करता एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक गोष्ट ही माणसाच्या उपयोगी आली पाहिजेच असे नाही. जंगलातील प्रत्येक झाडावर कुठला ना कुठला तरी जीव अवलंबून असतो. तो जीव प्रत्येकवेळी माणूसच असेल असे नाही.

Ecological Society मधील अभ्यासक्रमा मध्ये आम्हाला महाजन सरांनी एक गोष्ट सांगितली होती. बहिणाबाईंच्या एका कवितेत “सालई” (Boswellia serrata) आणि “मोई” (Lannea coromandelica) अश्या दोन झाडांचा उल्लेख आहे. तो असा की ही दोन झाडे बहुतेक वेळा एकत्र दिसतात मैत्रिणीं प्रमाणे. ह्या उलट “सालई” किंवा “मोई” एक एकटे असतील तर त्यांची वाढ नीट झालेली दिसत नाही. ह्याला Botany मध्ये वनस्पती संघटना (Plant Associations) असे म्हटले जाते. वैज्ञानिक दृष्ट्या बोलायचे झाले तर “सालई” मध्ये जी पोषण मूल्ये कमी आहेत ती “मोई” चे झाड पूर्ण करते. त्याच प्रमाणे, “मोई” ला ज्या गोष्टी जमिनीतून मिळू शकत नाहीत त्या “सालई” तिला पुरवते. किती सुरेख विचार आहे हा! पोषण मूल्यांची देवाण घेवाण! म्हणजे प्रत्येक झाडाचा माणसाला प्रत्यक्ष उपयोग नसला तरी अप्रत्यक्ष नक्कीच उपयोग आहे. बाकी काही नाही तरी कुठले ही झाड हे मोठे झाले की माणसाला कमीत कमी सावली तरी नक्कीच देते!!

निसर्ग, झाडे, प्राणी ह्या व्यतिरिक्त आजून एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे मनुष्य प्राणी. कोकणातील आमचे मनुष्य शेजारी सुद्धा खूप मनोरंजक आहेत, त्यांच्या वर स्वतंत्र पणे लिहिता येऊ शकेल इतकी. पण, ह्या तीन चार वर्षांच्या वास्तव्यात आम्हाला सध्या तरी आमचे “विठू” आणि “रखमा” मिळाली आहेत. त्यांचे आणि आमचे संबंध कायम राहोत ही आम्हा सर्वांची इच्छा आहे, ते टिकवण्याचे आम्ही आणि ते दोघे आटोकाट प्रयत्न करत असतो.

आम्हला बरेच जण विचारतात, की हे सगळे तुम्ही का करता, गुंतवणुकीवरील परतावा (Return on Investment) काय मिळतो इत्यादी… ह्या प्रश्नाचे एकच उत्तर, आम्हाला ह्यातून असीम समाधान मिळते, पराकोटीचा आनंद मिळतो, नुसते कोकणात जायचे असे म्हटले की इतकी ऊर्जा मिळते की विचारता सोया नाही. आमच्या मते हाच सगळ्यात मोठा Return on Investment आहे, जो पैश्यात कधीही मोजता येणार नाही…

 

4 thoughts on “मुक्काम पोस्ट मुचरी

  1. फारच छान!! भारी आहात तुम्ही दोघेही! जे स्वप्न पाहताय ते सत्यात उतरवताय.
    माझ्यासारख्या शहरापासून दूर… निसर्गासोबत, निसर्गाला धरून राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मस्त मोटिवेशन!
    लिहीत रहा आणि भरपूर फोटो टाकत रहा…

    Like

  2. खुपच छान!
    आमच्या धावत्या भेटीला सहज दोन वर्षे होऊन गेली असावीत पण आठवणी ताज्या आहेत. तुमच्या सारख्यां कडून प्रेरणा घेउनच तर आमचीही इटुकली बाग उभी राहिली. अजूनही विहीर बांधण्याचा विचार मनात आला की तुमचीच विहीर आठवते व नकळत हात सलामीखातर उंचावतो. असे धाडस आमच्याकडून होणे नाही.
    आणखी काय लिहू, असेच झाडे लावत व जगवत रहा, त्यातून आनंद लुटत रहा व जगालाही देत रहा हीच सदिच्छा. आणि हो, लेखणी देखील वाहती ठेवा.

    Like

Leave a reply to अभिजित गांधी Cancel reply