Wildlife….at our doorstep

Mercy by Rudy Francisco

Coincidently in our home, this method is used for every wild trespasser. Be it a spider, house shrew, bug, rat, bat, squirrel, gecko, slug, bird, frog, or for that matter snake. The size of the “cup” changes with the size of the trespasser. Killing a wild creature that enters our home is a strict no-no. That rule is also applicable to our pet cats. They do break the rule now and then following their instinct to hunt. But we make it a point to rescue a relatively unharmed prey and release it back to the garden. The cats of course are extremely disappointed.

I have had the good fortune of being surrounded by plants since childhood. I remember during my college days; I would take a small diversion on my way home to visit a sapling nursery occasionally. This alone time allowed me to soak in the green energy generated by the tiny saplings, a rare treat in the concrete forest of Mumbai. I would carry home a sapling or two to be cared for. This habit continued into my youth until finally my husband, and I decided to build our own home surrounded by a garden. We had a lovely, landscaped garden with a patch of lawn and exotic flowering bushes in the initial years. Our landscape artist had left some empty spaces to plant trees and bushes of our choice.

I remember the very first sapling that we bought was that of ‘Anant’, a small-sized tree with fragrant flowers. Of course, the sapling came with a lot of care instructions so that it grows well and bears a lot of flowers. We followed the instructions to the letter and within a few weeks, the sapling showed the first buds of the long-awaited flowers. One morning to my horror, I found that the buds were chewed off. On closer observation, I saw large caterpillars chomping away at the tender buds. I banished the caterpillars to a nearby bush telling them sternly “Go feed someplace else and leave my ‘Anant’ tree alone”

That same year we got hold of a book authored by Shrikant Ingalhalikar. In one of the chapters, the author narrated his experience with his favorite ‘Bahava’ sapling. He was horrified to see the sapling plagued by caterpillars. He tried all measures of stomping and killing the caterpillars, spraying pesticide, etc to get rid of the bugs, but to no avail. Finally, he observed that the caterpillars had hatched from the eggs of the Common Emigrant butterfly. This discovery sparked a new interest, and he stopped the massacre of the caterpillars. He instead decided to watch the caterpillars develop into butterflies. He noticed that as he allowed the butterflies to thrive, his garden got a lot of other visitors which were not seen before. Spiders and other small insects came to feed on butterfly eggs, small birds came in to feed on the spiders, larger birds came to feed on smaller birds, and so on. Some of these visitors became permanent residents in his garden. Thus, making his garden a livelier place. We were enthralled reading this experience. For us novice gardeners there were quite a few takeaways.

We learned to identify a diseased plant from a healthy plant. If you see the young of any creature merrily chomping away at the tender leaves or buds, there is no need to worry. The plant is very healthy and that is exactly why the mother has chosen to lay eggs on that plant. She wouldn’t have done so if the plant was sick. So don’t bother to bring out the so-called medicines and try to cure the plant.

Young of any insect eating away at tender leaves is a sign of a healthy plant

If you are wondering why the insect has chosen your favorite plant, do a little bit of investigation. It may turn out that your favorite plant is the host plant for a specific species. A long time after we started our garden, we came to know that our favorite ‘Kadhipatta’ tree is host to the Common Mormon butterfly. We simply cannot divert Mumma Mormon to lay her eggs someplace else. Kadhipatta and Lime trees are her evolutionary choices for laying eggs. This also means Mumma Mormon has been doing this even before the homo sapiens arrived on the evolutionary horizon. 

Mormon Butterfly and Kadhipatta – evolutionary association

Having insects visit the plant is beneficial to the plants. They facilitate pollination. Thereby aiding fruiting and flowering. Spraying the plants with chemicals to achieve the same result is somehow hard to understand and a bit expensive

Many times, insects herald that something wonderful is about to happen. This monsoon I was eagerly awaiting my ‘Sontakka’ to bear flowers. One fine morning I saw a clump of ants on a random stalk. The ants were not seen anywhere on other ‘Sontakka’ stalks. I observed that stalk for days. Within a week I got the first glimpse of ‘Sontakka’ bud. I have been showered with lovely fragrant flowers ever since. 

The clump of ants and the first sighting of Sontakka bud

What is Wildlife and why should it matter at all? Wildlife is creatures who are not humans and are not domesticated. So even an insignificant ant, sparrow, spider, grasshopper, or lizard is wildlife. There is no need to take a trip to the wildlife sanctuary to meet and greet the wild. Those wild creatures can be in any place. That any place could be right outside our doorstep.

Since ancient times human ancestors have observed the wildlife at their doorsteps to make near accurate weather predictions, or predictions relating to natural calamities. With the advent of the modern age, we homo sapiens have elevated ourselves above the rest of the animal and plant world. These wild creatures are more than just bugs or pests. For once, they have existed for millions of years before we came along. They do not speak our language, but they do communicate.

For instance, the velvet mite is gone all summer. But it appears out of nowhere when it is going to rain, and rain it does when the velvet mite is sighted! The termites know the exact moment to leave their nest. Just before it starts raining, that too the first rain of the season, millions of young queen termites and drones leave their home in search of the mate. How can they accurately predict rains? Honeybees can keep a count of days ever since they hatch out of their eggs. They promote themselves in the hive hierarchy as they age day by day taking over tasks of increasing responsibility. How did they learn math? Frogs can find the shortest route to the water. Where did they get the map of the area? There are numerous such examples to learn from.

And yet, we humans fail to show them mercy let alone welcome them in our lives. Going back to the quote by Rudy Francisco, can we not think of this wildlife as some creature caught in an unwanted situation and let them pass or pick them up and gently place them out of our way? Can we not give them a second chance? What if tomorrow we found ourselves in the wrong place and time, will we not expect to be treated with mercy?

Our beautiful, landscaped garden, the patch of lawn, and the exotic bushes are long gone. But we don’t regret the loss. They are now replaced by freely growing shrubs and trees that although selected and planted by us are never pruned. They provide the much-needed space and hideout for all the wildlife in our surroundings. The creatures now probably know that our neighbors may not be tolerant of them, but they are always welcome in our garden.

Environmentalists and scientists all around the world say that if humans are wiped out, wildlife will thrive. However, if the wildlife is wiped out, humans don’t stand a chance to survive. This is how important wildlife is. But all hope is not lost. We can do our tiny bit and dedicate some space in our homes and neighborhoods to wildlife. Have some dedicated corners which imitate wild spaces forming tiny sanctuaries within the urban spaces. And yes, if at all a wild creature mistakenly crosses your path, please do have a cup and napkin ready!

Shivangi Chandrashekhar Datar

13-Aug-2022

Invest in our Planet

April 22 is celebrated as the World Earth Day all across the globe since 1970.

I was unaware of such a day till this year. I was invited by Rotary club Pune West. The theme this year was “Invest in our Planet”.

As I checked all the official sites regarding World Earth day, I realised that the World Earth day was relegated to numerous events across the world. That left me wondering, how this relates to the theme “Invest in our Planet”

I therefore started preparing for the talk based on our understanding of “Invest in our Planet”. Sharing here a link to the recording of my talk.

Mrs. Shivangi Chandrashekhar Datar

25-Jul-2022

गोष्ट

ज्यांना लहानपणी आजी, आजोबा, आई, बाबा ह्यांच्या कडून गोष्टी ऐकायला मिळाल्या ती मंडळी अतिशय भाग्यवान आहेत असं मला वाटतं. “मुल”पणाचा हक्काचा आणि अविभाज्य घटक म्हणजे रात्री झोपाण्याआधी हट्ट करून ऐकलेली गोष्ट.

इंदू आजी म्हणजे माझ्या बाबांची आई येणार असली की मी अगदी खुशीत असे. त्याचं मुख्य कारण म्हणजे रात्री तिच्या जवळ पडून गोष्टी ऐकायला मिळायच्या. दूरदर्शन वर रामायण मालिका खूप उशिराने आली. आजी आली की रोज रात्री आम्हला रामायणातील एक-एक किस्सा (आता च्या भाषेत episode म्हटलं तरी चालेल) ऐकायला मिळत असे. त्याच बरोबर बोबड्या राण्यांची गोष्ट, हावरट राणी ची गोष्ट, सुमती-कुमती ची गोष्ट अश्या अनेक गोष्टी जोडीला असत ते ही नकला करून किंवा आवाज बदलून. गंमत म्हणजे सर्व गोष्टी अगणित वेळा ऐकलेल्या असल्या तरी दरवेळी नवीच गोष्ट ऐकणार आहोत ह्या उत्साहाने आम्ही ऐकायचो आणि तेवढ्याच उत्साहाने आजी सांगायचीही.

नंतर थोडे मोठे झाल्यावर बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी सांगितलेल्या शिवाजी महाराजांच्या काही निवडक गोष्टींच्या cassettes एका वाढदिवसाला भेट मिळाल्या. त्या गोष्टींची किती वेळा पारायणा झाली असेल देवास ठाऊक! पण प्रत्येक वेळी हिरकणी ची गोष्ट ऐकली की रायगडावर न जाता सुद्धा रायगडाचा कडा डोळ्यांसमोर उभा ठाकत असे. घोडेस्वारांनी हंडा घरी आणून दिल्यावर “बाई, ह्यो माझा हंडा, राहिला की काल राती  गडावरच ” असे उद्गार काढणारी आणि त्यानंतर घोडेस्वारांचे गोंधळलेले चेहरे बघून घाबरी-गुबरी झालेली पोरसवदा हिरा गवळण अगदी लखं उभी राहत असे. प्रतापराव गुर्जरांना गेलेलं महाराजांचे आज्ञापत्र “बहलोलखान या गनिमास गर्दीस मिळविल्याविणा आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका” हे किती ही वेळा ऐकलं तरी जीवाचा थरकाप होत असे. ह्या व्यतिरिक्त शाळेत वाचनाच्या तासाला अमर चित्र कथांचा रतीब असे तो वेगळाच.

गोष्टी ऐकून आपल्याला नक्की काय मिळतं? अहो, काय मिळत नाही विचारा! लहान पणी ऐकलेल्या बोबड्या राण्यांच्या गोष्टीतून नको तिथे बोलायला जाऊ नये अशी संयमाची शिकवण मिळते. त्याच बरोबर “कढी” उत्तम होण्यासाठी ची रेसिपी सुद्धा मिळते…”हिंग, मीय, जिय घाली; कयी चांगी होई” म्हणजेच कढी करताना त्यात हिंग, मिरं आणि जिरं घातलं की फक्कड कढी तयार होते! सुमती आणि कुमती ह्या दोन बहिणींची गोष्ट संकटात असलेल्या सर्वांना आपल्या परीने मदत करावी ही शिकवण देऊन जाते. अडचणीत असलेले सर्व म्हणजे फक्त माणसं नाही तर झाडं , प्राणी, पक्षी हे सर्व सुध्दा आले. इयत्ता चौथीतील चतुर शेतकऱ्याच्या गोष्टी मधून भुईमुगाच्या शेंगा जमिनी खाली, ज्वारीची कणसं रोपाच्या अग्र भागी तर मक्याची कणसं रोपाच्या मध्य भागी येतात हे सामान्य ज्ञान मिळतं. इतिहास, भूगोल हे नावडते विषय गोष्ट रुपात आणीले तर कायम स्मरणात राहतात. ह्या शिवाय रामायण, महाभारत, पंचतंत्र, जातक कथा हे तर खजिनेच आहेत आपल्या संस्कृतीचे. पण ह्या सर्व गोष्टींपेक्षा अधिक मोलाची म्हणजे आपली “ओळख” आपल्याला ह्याच गोष्टींमुळे मिळते.

सध्या मी रॉबिन वॉल किमरेर हिने लिहिलेलं पुस्तक वाचायला घेतलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे “Braiding Sweet Grass: Indigenous Wisdom, Scientific Knowledge and the Teachings of Plants”. लेखिका ही मूळची अमेरिकन आहे. म्हणजे USA ची नागरीक ह्या अर्थी मूळची अमेरिकन नाही तर ख्रिस्ती धर्मप्रचार करणाऱ्या युरोपियन लोकांनी अमेरिके मध्ये शिरकाव करण्या आधी तिथे असलेल्या आदिवासी लोकांची वंशज आहे. ह्या पुस्तकातील पहिलेच प्रकरण वाचून मला अक्षरशः हेलावून सोडलं. गोष्टी चे माणसाच्या आयुष्यातील स्थान आणि महत्व काय ह्याचा एक नवीन दृष्टीकोन दिला.

पहिल्या प्रकरणात रॉबिन आकाश लोकांतून आलेल्या एका स्त्री ची गोष्ट सांगते ती अशी …

आकाश लोकातून एक स्त्री खाली पडते. खाली मिट्ट काळोख आणि खोल खोल पाणी दिसतं तिला. तिला आकाशातून पडताना बघून बगळे तिच्या मदतीला धावून येतात. इतक्या उंचीवरून पडुन तिला ईजा होऊ नये म्हणून तिला अलगद आपल्या पंखावर झेलतात. पण तिचा भार ते फार काळ पेलू शकणार नाही ह्याची कल्पना येते आणि ते पाण्याच्या दिशेने झेपावतात. त्यांची धडपड बघुन कासव पुढे येतं आणि तिला सुखरूप आपल्या पाठीवर पेलतं. त्याला ठाऊक असतं की ह्या आकाश लोकीच्या स्त्री ला जमीन लागेल, पण सगळीकडे पाणीच पाणी. मग हिला उतरवणार कुठे? सर्व प्राणी पक्षी कासवा भोवती जमा होतात. काहींना ठाऊक असतं की पाण्यात खूप खोलवर माती आहे. सगळे जण पाण्यात आळीपाळीने बुडी मारून माती आणायचा प्रयत्न करतात. शेवटी एका छोट्याश्या उंदराला चिमुटभर माती आणण्यात यश येते, पण त्यासाठी त्याला त्याचा जीव गमवावा लागतो. त्याने आणलेली ती चिमुटभर माती घेऊन ती आकाशातील कन्या आपली दिव्य शक्ती वापरून “Turtle Island” म्हणजेच आजच्या उत्तर अमेरिका ह्या खंडाची निर्मिती करते. एखाद्या चांगल्या पाहुण्याप्रमाणे ती रिकाम्या हाती आलेली नसते. आकाशातून खाली पडताना आकाशातील हाती लागलेल्या अनेक वनस्पतींच्या बिया आणि रोपं ती बरोबर घेऊन आलेली असते. त्या बिया आणि रोपं वापरून ती अनेक बागा तयार करते. तिने तयार केलेल्या बागांमुळे तिला ज्या सर्व जीव सृष्टी ने मदत केलेली असते त्या सर्वांची खाण्यापिण्याची चिंता कायमची मिटते. आकाश लोकतून खाली आलेली ही स्त्री आपल्या नवीन जगाचा फक्त स्वीकार करत नाही तर ह्या लोकीतील सर्व चराचर आणि तिच्या स्वतः च्या येणाऱ्या पिढ्यांसाठी अन्न आणि औषधांची कायमची तरतूद करून ठेवते. तिच्या पुढच्या पिढ्यांना सर्व चराचर सृष्टी बरोबर प्रेमाने आणि सलोख्याने नांदायची सूचना देऊन जाते.

ह्या आकाश लोकीच्या स्त्री ची गोष्ट ऐकत ऐकत अमेरिकेतील “Native Indians” च्या पिढ्या वाढत गेल्या. निसर्ग आणि माणूस ह्यांच्यातील नातं सांगणारी आणि ते नातं दृढ करणारी ही गोष्ट. अमेरिकेतील ही माणसं निसर्गातील सर्व घटकांचा आणि विशेषतः वनस्पती विश्वाचा “Elders” म्हणजेच वडीलधारी मंडळी म्हणून उल्लेख करतात. कुठल्याही कठीण परिस्थितीत ह्या वडीलधाऱ्या मंडळींबरोबर सल्लामसलत करतात. ह्या सर्वांमध्ये सर्वात आधी निर्माण झालेली वनस्पती म्हणजे “Sweetgrass”. ह्या गवताला त्यांच्या संस्कृती मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या गवताच्या पिढ्या वाढवण्याची पद्धत म्हणजे एका पिढी कडून दुसऱ्या पिढी कडे ह्या गवताच्या रोपांच्या वेण्या वळून देण्याचा प्रघात आहे, म्हणून “Braiding Sweetgrass “. वेण्या का घालायच्या ह्याचं ही सुंदर विवेचन रॉबिन हिने दिले आहे. ती म्हणते वेणी घालून देणारी आणि वेणी घालून घेणारी ह्यांच्यात एक सुंदर नातं तयार होतं जे त्या वेणीने बांधलेलं असतं. वेणी घालून देणारीच्या मनात ती जीची वेणी घालून देते आहे तिच्या बद्दल अपार माया आणि प्रेम असतं. हे वाचून मला जुन्या काळातील मराठी चित्रपटांमधील दृश्य आठवली. पोर वयातील सुनबाई चा तिच्या सासूने केसांचा खोपा घालून दिल्यानंतर सूनबाई वाकून तिच्या सासूबाईंना नमस्कार करते हे दृश्य. किंवा एकाच घरातील वेगवेगळ्या वयोगटातील मुली एकमेकींच्या पुढ्यात बसून स्वतः पेक्षा लहान मुलीचे केस विंचरून अवरून देतानाचं दृश्य. ह्या नुसत्या कृतीने देखील काळजी, माया, प्रेम व्यक्त होतं आणि ते पुढ्यात बसलेल्या मुली, सूने पर्यंत पोचतं सुद्धा!

इथपर्यंत वाचताना मी Native Americans ची निरागसता, त्यांचे निसर्गाशी असलेले अतूट बंधन अनुभवत होते. आपल्या संस्कृतीशी असलेलं साम्य देखील तपासून बघत होते. इतक्यात लेखिका आपल्याला वर्तमानात घेऊन येते. Ecology ची प्राध्यापिका असलेली रॉबिन तिच्या दोनशे हून अधिक ecology च्या विद्यार्थ्यांना एका प्रश्नावली द्वारे तपासत होती की किती जणांना माणूस आणि निसर्ग ह्यांच्यात काही सकारात्मक नाते संबंध दिसले आहेत. जवळपास शंभर टक्के मुलांकडून “निसर्ग आणि माणूस ह्यांच्या मध्ये कोणताही सकारात्मक नाते संबंध नाही” हे उत्तर आलं. म्हणजे ह्या पैकी कुठल्याच मुलाने किंवा मुलीने त्या आकाशलोकीच्या स्त्री ची गोष्ट कधी ऐकलीच नाही.

खिन्न पणे रॉबिन पुढे नमूद करते की ह्या मुलांनी दुसऱ्या एका स्त्री ची गोष्ट ऐकली आहे. ती सुद्धा आकाश लोकात एका सुंदर बागेत रहायची. पण त्या बागेतील फळं चाखल्या मुळे तिला शिक्षा म्हणून भूलोकी हद्दपार केले आहे. ही पृथ्वी तिचं घर नाहीच मुळी. इथे ती फक्त तिची शिक्षा संपेपर्यंत निवासासाठी आली आहे. आपल्या सोयी साठी तिला जे जे म्हणून हवं आहे ते ती ओरबाडून घेते, परतफेडीचा कुठलाही विचार न करता. ही पृथ्वी जणू तिला व तिच्या वंशजांना उपभोगण्यासाठीच निर्माण केली आहे एवढा एकच विचार तिच्या व तिच्या पुत्रांच्या ठाई आहे! दोन गोष्टींमध्ये किती कमालीचा विरोधाभास. पिढ्यानपिढ्या माणूस जी गोष्ट ऐकत जातो, ऐकवत जातो त्याचे परीणाम ह्या पृथ्वीवर होत जातात…आजची परिस्थिती बघता कोणती गोष्ट जास्त सांगितली गेली आहे ते उघड आहे!

Native American संस्कृती आता जवळ जवळ नामशेष झाली आहे. ख्रिस्ती धर्म प्रचारकांनी अगदी लहान लहान मुलं-मुली बळेनी उचलून नेऊन त्यांना युरोपियन भाषा आणि संस्कृतीचे शिक्षण देऊन त्यांची पाळं-मुळं विसरायला लावली. ही खरी ताकद आहे गोष्टींची.

शिवाजी महाराजांच्या जडण घडणीत त्यांना त्यांच्या लहानपणी जिजाबाई साहेबांनी सांगितलेल्या गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे. हरीतात्यांची गोष्ट सांगताना पु ल देशपांडे सांगतात की हरितात्यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्यांच्या बाळमुठीत एक अदृश्य शक्ती पेरली जी पुढील आयुष्यात एखाद्या अवघड प्रसंगी त्यांना बळ देऊन जाते. व्यक्तिमत्व विकास करण्यात हातभार लावणे, मुलांना काही भव्यदिव्य करण्यासाठी प्रेरित करणे ह्या सहज साध्य होणाऱ्य गोष्टींचे मूळ हे गोष्टीतच आहे. हल्ली मात्र केवळ मनोरंजन ह्या दृष्टिकोनातून गोष्टीं कडे बघितलं जातंय. मला तर अशी भीती वाटते आहे की संस्कृतीच्या पाऊलखुणा पुसण्यासाठी कुठल्या धर्म प्रचारकांची गरज उरली नाहीये. आपणच स्वखुशीने भलत्याच गोष्टी आपल्या लेकरांना सांगतो किंवा ऐकवतो. त्यात भर घालायला चंदेरी दुनिया तत्पर आहेच की. कसं थांबवता येईल हे? मी उपाय शोधते आहे आणि हो आपल्या गोष्टीही….

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार

२५-मे-२०२२

समृद्ध भटकंती

पर्यटन आणि आम्हा दातार मंडळींची कधीचीच ताटातूट झालेली. मुळात trip ला जाणे म्हणजे स्वतः trip चा आराखडा बनवणे आणि तो आमलात आणणे हा पायंडा माझ्या माहेरी आणि सासरी सुद्धा पडला आहे. Travel company बरोबर अमुक एक package घेऊन मग निर्धास्त होणे प्रकार नाही. जो प्रदेश बघायचा ठरेल तेथील पर्यटन स्थळांची माहिती काढून स्वतः सर्व व्यवस्था करून चालू लागणारे आम्ही. पर्यटक म्हणून शेवटचे आम्ही २०१४ मध्ये गेलो. त्यानंतर मात्र मुचरी एके मुचरी. लहान, मोठी सुट्टी मिळाली की तिकडे पळायचं. तिकडे राहून, तिथली हवा खाऊन, पाणी पिऊन टवटवीत व्हायचं आणि पुण्याच्या routine मध्ये परतायचं. हे गेली सात वर्षे अखंड चालू आहे.

गेल्या आठवड्यात धाकटे दातार घरी आल्याआल्या म्हणाले “मंगळवारी किंवा बुधवारी आंबोलीला जायचं आहे. ह्या वेळी मी एकटाच आहे. माझ्या हातून काही readings चे recording delete झाले आहे. ते readings परत घेण्यासाठी जायचं आहे. एक पूर्ण दिवस readings घेण्यासाठी आणि प्रवासाचे दोन दिवस, असा साधारण तीन दिवसांचा कार्यक्रम आहे”. MSc Bio-diversity च्या अभ्यासक्रमात internship च्या अंतर्गत दर महिन्याला तीन-चार दिवस आंबोली ला जाऊन तिथे ठरलेल्या ठिकाणी निरीक्षणे करून वर्षाखेरीच्या प्रबंधाची तयारी ही. दर वेळी बरोबर तीन-चार सहकारी आणि प्राध्यापक असे असतात. आंबोली ला एकट्याने पाठवायला काही हरकत नाही, पण महाराष्ट्र व्यापी ST चा संप अजून चालूच आहे. Private गाड्या थेट आंबोली पर्यंत नाही. सर्वांनी बसून प्रवासाच्या अनेक पर्यायांचा ऊहापोह केला. मग बाबाच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याला विचारलं आठवड्याच्या शेवटी गेलं तर चालणार असेल तर आम्ही दोघे ही बरोबर येतो तुझ्या. हिंडू तुझ्याबरोबर आणि जमेल तशी मदत ही करू.

ठरलं तर मग! गुरुवारी संध्याकाळी पुण्यातून निघायचं. रात्री आंबोली मध्ये मुक्काम. शुक्रवार आणि शनिवार निरीक्षण करणे, फुलं गोळा करणे ह्या साठी राखीव आणि रविवारी सकाळी पुण्याला परतायचे! आंबोली मध्ये कुठे राहायचं ह्या प्रश्नाला अर्थातच “जिथे तुम्ही सगळे राहता तिथे” हे माझं आणि शेखर चं एकमत झालं.  आंबोली मध्ये परब काकांच्या “श्री स्वयंभू” Homestay मध्ये राहायचं निश्चित केलं. रात्री आंबोली मध्ये पोचायला अकरा वाजून गेले होते. परब काका फक्त आम्हाला खोलीची किल्ली देण्यासाठी जागे होते. आडवार असल्यामुळे Homestay मध्ये बाकी कोणीही पर्यटक नव्हते. आम्हाला “company” देण्यासाठी त्यांची welcome party मात्र सज्ज होती.

“श्री स्वयंभू” मधील “Welcome Party”

सकाळी उठून आवरून आम्ही जंगलात निघालो. अर्थात जंगलात म्हणजे खूप आत न जाता, जिथे रस्त्या कडेलाच फुलं आहेत अशी काही ठिकाणं निश्चित केलेली होती. तिथे सकाळी दोन तास आणि दुपारी दोन तास अश्या निरीक्षणाच्या वेळा ठरलेल्या होत्या. अथर्वला आपले काम करू देत मी आणि शेखर स्वतंत्र फिरू लागलो. खूपच दिवसांनी अशी निवांत भटकंती करत होते. मुचरी ला आमच्या जंगलात फिरतो, पण बरोबर कोणी असलं तर परत घरी जायची घाई सुद्धा असते. इथे प्रत्येक पान, फुल, झाड, फळ अगदी मन भरे पर्यंत बघता येत होतं. मुख्य म्हणजे मुचरी मध्ये न दिसलेली किंवा बघितलेली जैवविविधता इथे बघायला मिळाली. महाजन सरांची “देशी वृक्ष” व “आपले वृक्ष” ही पुस्तकं मी घरी असले की अनेक वेळा डोळ्याखालून घालते, एखादे झाड ओळखू आलं नाही की त्याचे फोटो काढून घरी येऊन पुस्तकात बघते. ती माहिती शोधताना इतर अनेक झाडांची नावे आणि माहिती अनाहूतपणे बघितली जाते. ह्या सवयीचा उपयोग ह्या भटकंती मध्ये झाला. शेखर ने एक नखशिखान्त फुललेलं झाड दाखवलं. तो “गेळा” वृक्ष होता. मी कधीही न पाहिलेला पण सरांच्या पुस्तकात अनेक वेळा बघितलेला. प्रत्येक्षात मात्र त्याचं रुपडं फारच मनोहारी! भर उन्हात कुठेही पाण्याचा लवलेश नसताना सुरेख चकचकीत हिरवीगार पानं आणि पानांच्या मध्ये अग्रभागी नाजूक पांढरी फुलं.

गेळा

नंतर त्या भागात जिथे तिथे गेळा दिसू लागला. गेळा वृक्षाचे कौतुक करत असताना अचानक सुंदर नाजूक हिरवीगार पालवी असलेलं एक छोटं झुडूप वजा झाड दिसलं. आधी करवंद वाटलं, पण एकही काटा नाही, त्यामुळे करवंदाची खूण पटेना. आणि पानं इतकी लुसलुशीत होती की कोणत्यातरी कीटकाच्या पिल्लांनी त्यावर ताव मारलेला होता. इतक्यात रस्त्याच्या पलीकडून शेखर ने काही तरी बघायला बोलावलं. एका बाजूला झाडाच्या फांदीवर मोहरी येवढ्या आकाराचे पांढरट गोळे चिकटवल्या सारखं काही होतं. Ecological Society च्या Jungle camp मध्ये हे मी बघितलं होतं, त्यामुळे चटकन ओळखलं की ही तर अंजनी किंवा अंजन वृक्ष. फांदी चे अजून जवळून निरीक्षण केले आणि काही ठिकाणी बारकी बारकी निळी फुलं उमललेली दिसली आणि खात्री पटली. “अंजन कांचन करवंदीच्या महाराष्ट्र देशा….” ह्या गीता मधला हा सदाहरित सुंदरसा वृक्ष! पाने बघितल्यावर कळलं आधी बघितलेली नाजूक हिरवीगार पालवी आणि ह्या झाडाची पाने सारखीच! परत गेळ्या च्या बाबतीत झालं तसं जिथे तिथे अंजनी दिसू लागली. अंजनी त्या भागात सर्वात dominant वनस्पती आहे असं दिसून आलं.

अंजनी ची पालवी, कळ्या आणि काही उमललेली फुलं

कुंभार्ली घाटातून जा ये करताना गाडीच्या खिडकीतून दिसणारा भामणी चा फुलोरा अगदी हात लावून बघता आला. पूर्ण उमललेली फुलं आणि नुकतीच उमलू लागलेली फुलं ही बघता आली. खुळखुळा म्हणजे crotalaria किंवा rattlepod ची पिवळी धम्मक फुलं आणि त्याच्या लाल-चॉकलेटी गुबगुबीत शेंगा ही बघता आल्या. मटार, तूर, मुगाच्या कुळातील म्हणजे Fabaceae family मधील हे खुळखुळ्याचं झुडूप ह्या रानात नक्की Nitrogen Fixing चे काम करत असणार असा विचार डोक्यात येऊन गेलाच!

भामणी ची पूर्ण उमललेली फुलं
खुळखुळा ची फुलं आणि शेंगा

नाजूक सुंदर फिकट पिवळी फुलं कुठली हे अथर्वला विचारलं तर दातपाडी असं उत्तर आलं. दातपाडी किंवा रामेठा ह्या झुडूप वजा झाडाच्या अनेक आख्यायिका शालेय जीवनात ऐकल्या होत्या. एक गोष्ट अशी की काही पोरं trekking ला गेली आणि जंगलात तीन दगडांची चूल पेटवून त्यावर खिचडी करायला ठेवली. ढवळायला डाव, चमचा काही नव्हतं म्हणून एका झाडाची फांदी घेतली आणि ती खिचडी ढवळायला वापरली. गरमागरम खिचडी खाऊन मंडळी निद्राधीन झाले. सकाळी उठल्यावर मात्र हाहाकार झाला! सर्वांचे दात गळून पडले होते. स्थानिक मंडळींना घडला प्रकार कळल्यावर त्यांनी वनस्पती चे नाव “दातपाडी” म्हणजे रामेठा सांगितले. ही गोष्ट किती खरी आणि किती अतिशयोक्ती ते ठाऊक नाही, पण विषाची परीक्षा कोण बघणार नाही का…रामेठा ला हात न लावता त्या सुंदर फुलांचे फोटो काढून संग्रही ठेवले. मुचरी मधील काही परिचित वनस्पती जसा “कुंभा” वृक्ष किंवा “कानफुटी” वनस्पती ही देखील बाकी अनोळखी मंडळी मधून डोकावत होतीच!

दातपाडी किंवा रामेठा
“कानफुटी” वनस्पती
कुंभा चे फुल व कळ्या

सकाळची निरीक्षणे करून झाल्यावर अथर्व आम्हला त्याच्या प्राध्यापकांचे सहकारी श्री. हेमंत ओगले ह्यांच्या कडे घेऊन गेला. श्री. ओगले Whistling Woods ह्या resort चे मालक आहेत आणि फुलपाखरांचे अभ्यासक ही आहेत. शिक्षणाने engineer असलेले श्री. ओगले मूळचे आंबोली चे.  नोकरी न करता आंबोली मध्ये Whistling Woods ह्या नितांत सुंदर अश्या resort ची बांधणी केली आहे. पश्चिम घाट आणि सह्याद्री मधील फुलपाखरांचा नुसता अभ्यासच नाही तर एक उत्कृष्ट दर्जाचे butterfly reference book ही त्यांनी तयार केलं आहे. Whistling Woods मध्ये प्रवेश करणं हा खूपच सुखावणारा अनुभव होता! प्रवेश द्वारातून आत शिरताना डावीकडे अनेक फुलझाडांचे प्रकार लावले आहेत. त्यावर नुकतेच पाणी मारले होते, त्यामुळे असंख्य फुलपाखरं त्या आसमंतात अक्षरशः बागडत होती!  Whistling Woods मधील cottages  ही मन लावून design केलेली आहेत आणि प्रत्येक cottage ला एका एका जातीच्या फुलपाखराचं नाव दिलेलं आहे! नुसतं त्या परिसरात जाऊन सुद्धा चित्त-वृत्ती प्रफुल्लित झाल्या! Whistling Woods हे प्रत्यक्षात अनुभवायला हवं, त्यामुळे कुठले ही फोटो न काढता तिकडून निघालो. हेमंत ओगले ह्यांची स्वाक्षरी असलेल्या फुलपाखरांच्या त्या संदर्भ ग्रंथाची एक प्रत मात्र विकत घेऊन तिकडून निघालो.

दुपारच्या फेरीत आम्ही दोघांनी जायचं नाही असं ठरवलं. संध्याकाळी अथर्व ची वाट बघत आम्ही थोडे पाय मोकळे करायला म्हणून निघालो. तर वाटेत अजून एका सुंदर वनस्पती ने माझं लक्ष वेधून घेतलं. ती म्हणजे वाकेरी! वाकेरी हा शब्द माझ्या परिचयाचा कारण पूर्वी वाकेरी लोह नावाचे आयुर्वेदिक औषध घेतलेलं. मध्यंतरी कुठे तरी फुलांचा फोटो बघितलेला त्यामुळे डोक्यात fit बसलेली. फुलं सुंदर लाल-पिवळ्या रंगाच्या विविध छटा असलेली, एका अक्षावर गोलाकार रचना असलेली ती फुलं अतिशय डौलदार दिसतात. फुलांचा फोटो पाठवल्यावर बहिणीला मोह झालाच. वाकेरी गच्चीवरील बागेत लावता येईल का? कितीही मोह झाला तरी वाकेरी हा मोठा वेल आहे आणि तो जंगलात शोभून दिसेल. फार तर farm house मध्ये लावता येईल.

वाकेरी

बरचसं काम पहिल्या दिवशी उरकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी चौकुळ गावातील केगदवाडी मध्ये जाऊन शेवळी ची फुलं गोळा केली. ह्या फुलांचं तेल काढून त्याच्या पृथक्करणा साठी पुण्यातील NCL मध्ये द्यायचे होते. परतताना “सदाची राई” आणि “लिंगाची राई” ह्या दोन राईना धावती भेट दिली आणि पुण्याची वाट धरली..

शेवळी किंवा Wendlandia ची फुलं – ह्या trip ची नायिका

अनेक वर्षांपूर्वी गोव्याला जाताना आंबोली मधून सावंतवाडीला गाडी ने प्रवास करत गेलो होतो. त्या प्रवासात आंबोली च्या जंगलातून जाताना मनात एक आठवण कोरली गेली होती ती म्हणजे सुवासाची. आंबोली म्हटलं की सुवासिक जंगल हे समीकरण मनाने अगदी पक्क केलं होतं. पण त्या जंगलातून जाताना वाटेत गाडी थांबवून तो सुवास नक्की कुठल्या कुपितून येतोय हे शोधायची उसंत नव्हती किंवा मुभा घेता आली नाही कारण रात्र होण्याआधी गोवा गाठायचं होतं. ह्या भटकंती मध्ये मात्र ती मुभा घेता आली. निवांतपणा मिळाला. आंबोलीला आलोच आहोत तर तिथली सर्व ठिकाण बघितलीच पाहिजेत हा हावरटपणा न करता, शांतपणे संयमाने गोष्टी बघितल्या. खरोखर मनाला आणि चित्ताला समृद्ध करणारा अनुभव ह्या भटकंतीत मिळाला!

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार

१३-मार्च-२०२२

पडू आजारी(?)…

आज अनेक महिन्यांनी लिहायला घेतलं. विषय सुचत नव्हतें असं नाही, पण काहीच सुचत नाही अशी परिस्थिती काही महिन्यांपूर्वी माझ्या आयुष्यात निर्माण झाली होती.

२०२१ च्या मे महिन्यात एक मैत्रीण योगासनांचा वर्ग घेणार होती. अनेक वर्षांपूर्वी “योग शिक्षक” असलेली मी एव्हाना योगासनं करणं विसरून गेले होते. पण योगासनं करून किती उल्हसित वाटतं ह्या स्मरणाने मात्र मला तिचा महिन्याभराचा वर्ग करावासा वाटला. महिन्याभराने मी सूर्यनमस्कार नियमित घालायचा नेम केला आणि तो बऱ्याच अंशी पाळला. आपण ठरवलेली गोष्ट पुढे तशीच चालू रहावी ह्यासाठी जणू सारी सृष्टी आपल्याला साथ देते आहे हा माझा समज बळावत गेला . एक दिवस एका मित्राने “१०८ सूर्यनमस्कार” असा whatsapp group केला आणि मला सूर्यनमस्कार अनेक लोकांबरोबर घालायची आणि त्यावर PhD मिळवलेल्या तज्ज्ञाचे मार्गदर्शन घ्यायची आयती संधी चालून आली. एकूण सुर्यनमस्काराची गाडी व्यावस्थित रुळावर लागणार अशी चिन्हं दिसू लागली…

सहा ऑक्टोबर ची सकाळ मात्र वेगळीच उजाडली. नेहमी प्रमाणे सकाळी साडे पाच सहा ला उठायला गेले तर मनगटं, पावलं, घोटे हे सर्व सांधे आखडले होते. आपल्याला हे काय होतंय अचानक ते काही कळेचना. म्हटलं थोडे पाय मोकळे करून यावं म्हणजे बरं वाटेल, म्हणून अर्धातास फिरून आले. घरी पोचल्यावर पाय थर थर कापू लागले. आणि आज पर्यंत कोणत्याही आजारपणात कधीही न घडलेली गोष्ट घडली…मी माझ्या बहिणीला, अपूर्वाला फोन करून अक्षरशः भोकाड पसरून रडू लागले की मला बहुतेक arthritis म्हणजे संधिवात झाला आहे. संधिवातावर औषध नाही हे ठाऊक आहे. पण मला अचानक का व्हावा संधिवात, आणि मी अशीच राहिले तर…ह्या विचाराने माझ्या मनाचा थरकाप झाला…कुठल्याही भयपटाने किंवा थरारपाटाने मला कधीही इतकं हादरवलं नव्हतं.

थोड्या उशिराने पण त्याच दिवशी शेखर ही माझ्याप्रमाणेच आजारी पडला. दोघांचे एकच निदान चिकूनगुण्या आणि त्यामुळे उद्भवणारा संधिवात. डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं पुढचे कमीत कमी दोन तीन महिने हा त्रास सहन करावा लागेल.

Pain killers जे मला चालत नाहीत आणि त्यामुळे घ्यावे लागलेले steroids घेऊन सुद्धा परिस्थितीत काही फरक पडत नव्हता. पाय म्हणजे दोन अवजड ओंडके झाले होते जणू. अंगावर घेतलेलं पांघरूण जड व्हायचं. कुशीवर वळणं म्हणजे झोपेत सुद्धा सहज आणि आपसूक घडणारी गोष्ट प्रत्येक्षात करण्यासाठी पाच पाच मिनिटं प्रयत्न करावा लागत होता. कुशीवर वळ्यण्याची ही गत, तर झोपलेल्या अवस्थेत उठून उभं राहणं आणि स्वतः च्या पायाने चालत bathroom गाठणं ही तर शिक्षाच वाटायची. कुठल्याच अवस्थेत बरं वाटत नसे. ना झोपलेल्या अवस्थेत, ना बसलेल्या, ना उभ्याने. जवळ जवळ महिनाभर निराशाजनक परिस्थिती नंतर मात्र आयुर्वेदिक औषधं घ्यायला सुरवात केली. हळूहळू फरक पडत गेला. अजून ही पूर्ण बरी नाही झाले. खूप चालले, पायऱ्या चढ-उतर केल्या, हवामान बदललं की घोटा आणि पाऊल सुजतं. पण कुठलीच हालचाल करता न येणं, त्यापेक्षा ही परिस्थिती खूपच सुकर आहे.

असे अवघड प्रसंग माणसाला खूप काही शिकवून, देऊन जातात. मला ही ह्या आजारपणात काही अनमोल नाते संबंध अनुभवायला मिळाले. ते व्यक्त करण्यासाठीच तर ह्या लेखाचा घाट घातला..

Work from Home च्या काळात घरातील दोन्ही कर्त्या मंडळींनी एकाचवेळी आजारी पडण्याने खूपच पंचाईत झाली खरी. पण आम्हला आमच्या आजूबाजूच्या माणसांचा खूप आधार पण मिळाला. सर्वात भक्कमपणे उभी राहिली ती माझी धाकटी बहीण अपूर्वा. जे कोणी जो काही उपाय सांगतील, ते ती ताबडतोप आमच्या दोघांवर करायची, मग ते पपई च्या साला ने सांधे शेकणं असो, कोणी कुठलं औषध सांगितलं तर घेऊन येणं असो, किंवा अधून मधून चक्कर मारून आमची चौकशी करणं असो. ती तिचं कर्तव्य अगदी चोख बजावत राहिली.

घोटा व पाऊल सुजल्यामुळे मी हलू शकत नाहीये असं समजल्यावर धाकट्या बहिणीप्रमाणे असलेली माझी जाऊ अपर्णा हातातली कामं सोडून भल्या सकाळी मला पायाला तेल लावून द्यायला आली. तिने मला तेल लावून दिलं हे कळल्यावर माझी कामवाली बाई सुवर्णा चक्क हिरमुसली. म्हणाली “ताई, मी म्हणाले होते ना तुम्हाला पाय चोळून देईन, मग मला न सांगता अपर्णा ताईंना का सांगितलं”. दादांना आणि मला आराम मिळावा म्हणून ती दुपारी सर्व कामं आटोपली की येऊन जास्तीची कामं बिनबोभाट करून जायची. चार दिवस झाले तरी आमचं आजारपण संपत नाही बघून माझ्यापेक्षा दहा पावसाळे जास्त पाहिलेल्या पण एक ही इयत्ता न शिकलेल्या लता बाई म्हणाल्या “आजारपण हत्तीच्या पावलाने येतंय आणि मुंगीच्या पावलं जातं”. सुजलेला पाय बघून चक्क खाली बसल्या आणि दोन्ही हात माझ्या पावलावरून फिरवत “लवकर बरं वाटू द्या” असं म्हणत राहिल्या.

ह्या बरोबर माझ्या मावस व मामे सासवा आळी पाळी ने आणि मायेने आमची विचारपूस करत होत्याच. जमेल तसं फोन करून, घरी येऊन समाचार घेत होत्या. संध्यामामीला कोणी आमच्या इथे येणार असा सुगावा लागताच एकदा जेवणाचा पूर्ण डबा आणि एक दोन वेळा घरी केलेले शिंगाड्याच्या पिठाचे लाडू पाठवून दिले.

आमच्या आजारपणाची खबर बात माझ्या मैत्रिणींना माहिती झाली होतीच. माझे सांधे सुजतायत हे कळल्यावर वैदेही ने सांधेदुखीवरचं तेल पाठवून दिलं. तिला सांगितलं की तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे, तर ती आणि प्रमोद दोघे मुद्दाम आले. वैदेही ने चहा करून दिला. शलाका कडे हट्ट केला की घरात बसून बसून खूप कंटाळा आला आहे, तर ये गप्पा मारायला. ती आणि ललित दोघे ही मुद्दाम गप्पा मारायला आले आणि येताना घरी केलेलं गरम गरम soup ही आणलं. घरी चाट खात खात धमाल गप्पा रंगल्या आणि काही काळासाठी आम्ही दोघे आजारपण विसरलो. महिन्याभराने असंच whatsapp वर भेटायचं असं ठरलं आणि मृगाक्षी, वैदेही, प्रमोद आणि थोड्या उशिराने शलाका आणि ललित भेटायला, गप्पा मारायला आले. ती संध्याकाळ सुद्धा हसण्या-खिदळण्यात मस्त गेली.

लेकाचे मित्र घरी आले की चौकशी करीत, औषध आणून देत. लेकाच्या मित्रांकरवी शेखर च्या बाल मित्राला सतीश ला ही आम्ही आजारी असल्याचं कळलं. त्याने आणि दीपा ने फोन करून अंदाज घेतला. आमच्या आजाराचं स्वरूप चिवट आणि वेळखाऊ आहे असं समजताच बाकी मित्रमंडळींना एका शनिवारी थेट वाड्यावर (म्हणजे “झुळूक” मध्ये हो) येण्याचे फर्मान काढलं. एकूण काय, तर महिनोन-महिने एखादे get together ठरवायला वेळ लागतो, ते ह्या चिकूनगुण्या मुळे अगदी सहजी शक्य झालं.

पडू आजारी? तर नको रे बाबा! पण पडलोच तर माझ्याच वाट्याला का आले हे भोग! असा त्रागा करण्याऐवजी, थोडं शांततेने, संयमाने विचार करावा. शहरी वातावरणात आणि corporate संस्कृतीत शक्यतो सर्व गोष्टी स्वतःला manage करता आल्या पाहिजेत अशी अपेक्षा माणूस स्वतः कडून करत असतो. शक्यतो आपल्या मुळे इतरांना त्रास नको, हा मूळचा विचार असतो त्या मागे. मी ही त्याला अपवाद नाहीच. आणि आपण अनेक गोष्टी एका वेळी व्यवस्थित manage करू शकतो ह्याचा कुठे तरी अभिमान असतोच. आमच्या आजूबाजूला असलेली माणसं आपआपल्या परीने आम्हला बरं वाटावं ह्या साठी छोट्या छोटया गोष्टी करीत राहिले. त्यामुळे ह्या आजारपणात दुखणं सोसत नाही म्हणून जितकी रडले असेन तितकेच हसण्याचे, आनंदी रहाण्याचे क्षण ही मिळत गेले. ह्या आजारपणाने इतरांनी पुढे केलेला आधाराचा हात (प्रसंगी बोट सुद्धा) धरायला शिकवलं.

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार

२२ जानेवारी २०२२

कांदेपात पुराण

१.कांद्याची फुलं कोषातून बाहेर येताना; २.बिया धरलेली कांद्याची फुलं; ३.कांद्याची रोपं; ४.तयार कांदेपात

सकाळी फिरताना वाण्याच्या दुकाना बाहेर त्याने मोड आला आहे म्हणून भिरकवलेला कांदा न लाजता उचलणे..तो घरी आणून गच्चीवरील बागेत पेरणे..कालांतराने त्याला कळ्या आणि फुलं येतात, त्यांचा आनंद घेणे..फुलांच्या बहराचे फोटो टिपणे (आणि ते social media वर share करणे)..फुलां मध्ये बिया तयार होऊ देणे..फुलांचा बहर ओसरला की बिया काढून सावलीत मोकळ्या हवेवर वाळत ठेवणे..योग्य वेळी त्या पुन्हा पेरणे..रोपं उगवून आली की मोठया कुंडीत transplant करणे..मांजराने मोठी मोकळी कुंडी बघून त्यात प्रातर्विधी उरकून सर्व लावलेली रोपे मातीत पुरलेली दिसली तर पुन्हा उरलेली रोपे लावणे (हे मांजराला कंटाळा येई पर्यंत पुन्हा पुन्हा करत रहाणे)..त्यानंतर नियमित किंवा गरजे प्रमाणे पाणी देत रहाणे..(वरील वर्णन केलेली प्रक्रियेला जवळ जवळ ६ महिने लागतात, त्यामुळे घाई गडबड न करणे)…भाजी साठी कांदे पात तोडून आणताना एक-दोन पाती कुंडीत तश्याच ठेवून देणे म्हणजे पुढे त्याचे कांदे होण्याची प्रक्रिया बघता येते…कांदे पात आणली की आपल्या आवडी प्रमाणे ती रांधणे…ह्या रीतीने कांदे पाती ची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपन्न!

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार

१-ऑक्टोबर-२०२१

Avani-Mitra

I was invited to speak about our conservation project by Rotary Club – Bombay Sea face on the 28th of August 2021. So instead of writing a blog, this time around spent my time preparing for the talk.

You can see and listen to the talk here

I talked mostly about how over the years our (Chandrashekhar’s and mine) love for nature has taken different forms.

I also talked about what we feel is the need of the hour. That we as individuals should create, expand and conserve wild spaces and give a chance, if not equal, to all the non-humans. This in our opinion is one step we can take towards decelerating the speed at which we humans are proceeding on the path of self destruction.

Do watch and let me know what you think.

Shivangi Chandrashekhar Datar

30-Aug-2021

“बरका”सूर…

“कोकण” हा शब्द उच्चारला की पुणेकर-मुंबईकर मंडळींच्या डोक्यात पहिला आणि शेवटचा विचार येतो तो म्हणजे हापूस आंब्याचा! हापूस आंब्याचे वेड हे सर्वव्यापी आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पूर्वी फक्त मे महिन्यात मिळणारा आंबा आता लवकर लवकर म्हणता म्हणता अगदी फेब्रुवारी-मार्च पासून मिळू लागला आहे. आंब्याच्या वेडा पायी कोकणातील इतर बरीच फळं जशी जांभूळ, करवंद, पपनस, अळू, अंबूळकी इत्यादी दुर्लक्षित राहिली आहेत. त्यातील एक महत्वाचे फळ म्हणजे फणस. खरं तर फणसाला “फळ” म्हणणे थोडं विचित्र वाटतं. इतर फळं मोहक रंगाची, गोजिरवाणी, सहसा एका हाताच्या पंज्यात मावणारी असतात, पटकन उचलून खावी अशी. फणसाचे बाह्य रूपडं मात्र अजस्त्र शरीरयष्टी, ओबडधोबड आकार, काटेरी जाड जुड त्वचा आणि त्यामुळेच काहीसं विद्रुप. आतील गरे सुद्धा खूपच कष्टाअंती हाती लागणारे!

फणस

फणसाच्या अगदी लहानपणी च्या आठवणी म्हणजे एका कागदाच्या पिशवीत काही अखंड गरे आई किंवा बाबा बाहेरून येताना घेऊन येत. आधी ते गरे खायचे आणि मग राहिलेल्या आठळ्या मिठाच्या पाण्यात शिजवून सोलून खायच्या. एकंदर फणसाचा अनुभव सुखावह होताच कारण गरे आणि आठळ्या दोन्ही आवडायच्या. माहेर च्या चौकोनी कुटुंबात पाव किलो अर्धा किलो इतपत गरे आणले जायचे. उन्हाळा सुरू होण्याआधी बाजारात भाजीचे फणस आणून फणसाची भाजी न चुकता व्हायची.

सासरी आल्यावर एकूण माणसांची संख्या आणि आत्यंतिक आवडते फळ व खाण्याचे प्रमाण जास्त असल्या कारणामुळे फणसाचे गरे क्वचित विकत आणले जात. शेखर च्या आत्याच्या घरचे फणस दर वर्षी यायचे त्या व्यतिरिक सबंध  फणस विकत आणायचे व कापून खायचे अगदी तडस लागेपर्यंत. फणस कापायची “कला” मुलांबरोबर घरच्या सगळयांना अवगत झाली. कितीही मोठा फणस असो, पिकला की आम्ही सगळे उत्साहाने तो चिरायला घेत आणि गऱ्यांचे आणि आठळ्यांचे “व्यवस्थापन” करत. फणस चिरला की गरे भरपूर असत, त्यामुळे एक फणस पुढचे तीन चार दिवस पुरायचा. आठळ्या जमवून ठेवायच्या आणि एकदिवस सर्व आठळ्यांची भाजी करायची हा नेम असे.

बाजारातून विकत आणलेला फणस हा आत्याच्या  बागेतील फणसा इतका चांगला निघेल का अशी कायम धाकधूक असायची. फणस चांगला निघेल का ह्या शंके बरोबर तो बरका निघणार नाही ना ही धाकधूक असायची. बरका फणस पूर्वी कधी खाल्लेला नव्हता. आणि अनेक लोकांकडून बरका फणस चांगला नसतो, गिळगिळीत असतो, तो घश्यात अडकतो अशी वर्णनं ऐकलेली होती. त्यामुळे फणस कापा आणि गोड निघाला की सुटकेचा निश्वास सोडायचो आम्ही.

विकतचा फणस चांगला निघेल की नाही ही जरी धास्ती असली तरी कलिंगड ज्या प्रमाणात रंग आणि चवीच्या बाबतीत दगा देऊ शकतं तसा क्वचितच फणसाने दगा दिला. फणसाने काही वेळा तारांबळ मात्र उडवून दिली आहे!

एकदा भल्यामोठ्या कापा फणसाचा वास यायला लागला. पिकला असेलच ह्या खात्रीने चिरायला घेतला आणि आतून तो पूर्णपणे कच्चा निघाला.. देवा! आता काय करायचं ह्याचं असं म्हणत कोकणातील चुलत सासूबाईंन कडे धाव घेतली! कच्च्या फणसाचे तळगरे करतात हे ठाऊक होतं, पण मागे बहिणीने केलेले तळगरे पार फसले होते ते ही आठवलं. सासूबाईंशी बोलल्यावर साक्षात्कार झाला की तळगरे खोबरेल तेलात तळायचे त्याने ते खुसखुशीत होतात. एवढ्या मोठ्या फणसाचे तळगरे करायला किती खोबरेल तेल लागेल त्याचा काही अंदाज येईना आणि मी चांगल्या दोन मोठ्या खोबरेल तेलाच्या बाटल्या विकत आणल्या. तळगरे उत्कृष्ट झाले, पण जवळ जवळ दीड लिटर खोबरेल तेल शिल्लक राहिले. आता एवढे खोबरेल तेल कोणाच्या डोक्यावर थापायचे ह्याचा विचार करू लागले. एक दिवस मनाचा हिय्या करून खोबरेल तेल वापरून त्यात फोडणीचे पोहे केले. ते इतके उत्कृष्ट झाले की त्या नंतर आमच्या कडे फोडणीचे पोहे, उपमा, कडव्या वालाची उसळ, दुधी भोपळ्याची दह्यातली पचडी, इतकेच काय सुरमई, पापलेट हे तळायला सुद्धा खोबरेल तेलच नियमित वापरू लागलो.

अजून एका कोकण फेरीत पाटण च्या बाजारातून एक भला मोठा फणस विकत घेतला. गाडीची डिकी जवळ जवळ फणसाने व्यापून टाकली होती. वाटेतच फणस पिकला आहे ह्याची वर्दी त्याच्या वासाने दिली. दुसऱ्या दिवशी office, त्यामुळे घरी पोचल्या पोचल्या फणस चिरायला घेतलाच पाहिजे हे नक्की ठरलं. फणस चिरायला घेतला आणि काळजात धस्स झालं. पहिली चिर दिल्या दिल्या नुसत्या बोटाने फणस चक्क “फाडता” येत होता आणि आतून धो धो गरे कोसळत होते. सासूबाई एकदम कावऱ्या बावऱ्या झाल्या, म्हणाल्या “अगं हा तर बरका फणस आहे! आता काय करणार ह्याचं, कोणी खाणार नाही तो…” घाबरत घाबरत एक गरा तोंडात टाकला आणि…..एका क्षणात स्वर्गीय स्वाद आणि रसाने तोंड भरून गेले! इतके दिवस आपण कुठल्या स्वादाला आणि चवीला मुकलो आहोत ह्याची जाणीव झाली!

इतकं चविष्ट, रसदार फळ मी तोपर्यंत चाखलेच नव्हते. शेखर आणि मुले देखील पटा पटा गरे खाऊ लागले. फणस इतका प्रचंड होता की सर्वांनी खाऊन संपणे अशक्य. मग काय करावं अश्या विचारात असताना पुन्हा एकदा कोकणातल्या चुलत सासूबाईंचे स्मरण झाले! ताबडतोब त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलल्यावर माझ्या जीवात जीव आला. बरका फणसाची पोळी किंवा साठ आणि सांदण ह्या दोन्हीचे प्रमाण आणि कृती लिहून घेतली. गरे मनसोक्त खाऊन झाल्यावर मी पुरण यंत्रातून बाकीचे गरे फिरवले आणि पातेलं भर रस काढून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन ताटं फणसाचं साठ करायला उन्हात ठेवली आणि राहिलेल्या फणसाचे “सांदण” केले. रस काढल्यावर राहिलेला चोथा मला टाकवेना. मग त्यात थोडा गूळ, चवी पुरतं मीठ, मावेल तेवढी कणिक घालून त्याचे मुटके केले आणि उकडून कणीदार साजूक तुपाबरोबर सर्वांना सकाळी नाश्त्याला वाढले!

फणसाचे सांदण

बरक्या फणसाची अशी अचानक ओळख झाली आणि त्याच्या स्वादावर आणि चवीवर मी बेहद्द फिदा झाले! दर वर्षी बरका फणसाची मी आतुरतेने वाट बघत असते. कोकणात गेले तर आवर्जून माहितीतल्या लोकांना सांगून ठेवते की बरका फणस असेल तर मला हवा आहे म्हणून. दोन तीन वर्षांपूर्वी फणसाच्या मोसमात कोकणात जाऊन सुद्धा बरका फणस हाती लागला नाही. एक दिवस अचानक विशाखा चा कोकणातून फोन आला. तिने एका bus driver चा फोन नंबर दिला आणि सांगितलं की उद्या पहाटे driver ला फोन करा आणि त्याच्या गाडीतून फणस उतरवून घ्या. पहाटे साडे चार – पाच वाजता driver चा फोन आलाच आणि कुठे भेटायचं ते त्याने कळवले. बाहेर पावसाची रिप रिप चालू होती, अश्यात मी आणि अथर्व रस्त्यावर छत्र्या घेऊन bus ची वाट बघत उभे होतो. Bus आल्यावर driver ने आम्ही नक्की फणस वाले आहोत ह्याची खात्री करून घेऊन चार भलेमोठे बरके फणस आमच्या ताब्यात दिले. कोणी बघितले असते तर आम्ही नक्की फणसाची तस्करी करणारे गुंड आहोत ह्याची खात्री पटली असती. अगदी सत्तर च्या दशकातील सिनेमातील smuggling चे दृश्य होते!

एकंदरीत फणस अगदी “कोयरी” स्वरूपाचा म्हणजे लहान असल्या पासून तो पूर्ण पिके पर्यंत त्याचे विविध खाद्य पदार्थ करून खाऊ शकतो. कोवळ्या फणसाची भाजी, अर्धवट पिकलेल्या फणसाची भाजी, बिर्याणी, तळगरे आणि पिकल्यावर तर अनेक पक्वान्नं आणि खाऊ चे पदार्थ करता येतात. आठळ्यांची भाजी, पीठ आणि पुरण सुद्धा करता येते. ह्या सर्व फणसोत्सवात अजून एक गोष्ट उमजली. हा वृक्ष तजेलदार , सुखावणारा दिसतो. उत्तम आरोग्यदायक घटकांनी परिपूर्ण अशी फळे देणारा व दीर्घायुषी असतो. रानावनात सहसा आढळत नाही तर घराजवळ जास्त चांगल्या प्रकारे वाढतो म्हणजे कदाचित मनुष्याचा सहवास हवा असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाऊस , ऊन , वारा , थंडीचे प्रमाण किंवा अवेळी होणारे वातावरणातील बदल , ह्या गोष्टींचा काहीही परिणाम फळ धारणेवर , चवीवर होत नाही असा सद्गुणीही असतो.

गेल्यावर्षी मैत्रिणी कडून बरेच बरके फणस मिळाले. काही नातेवाईकांना हवे होते त्यामुळे माझ्या वाट्याला एकच फणस शिल्लक राहिला. तो चिरताना अक्षरशः एक गरा तोंडात आणि एक पातेल्यात ह्या क्रमाने माझं काम चालू होतं. WhatsApp वर दिराचा फोटो झळकला. एका हातात फणसाचे मधले जाडजूड देठ त्याने खांद्यावर गदे सारखे धरले होते आणि फोटो ला caption “बरकासुर” असे होते. मी म्हटलं हा नुसता फोटो पुरता “बरकासुर” आहे. मी मात्र खरी खुरी “बरकासुर” आहे…

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१५-जुलै-२०२१

हर बात होगी मनचाही….

“Beauty lies in the eye of the beholder” म्हणजे एखादी वस्तु, व्यक्ती किंवा अन्य कुठलीही प्रेक्षणीय गोष्ट ह्याच्या सौन्दर्याचे प्रमाण वेगवेगळं, किंबहुना ते व्यक्ती सापेक्ष असतं. तरीही एका ठराविक साच्यातील सौन्दर्याला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. सुंदर स्त्री म्हणजे गोरी, शिडशिडीत, लांब सडक, सरळ आणि काळे भोर केशसंभार असलेली; सुंदर पुरुष म्हणजे उंचापुरा, नाकी-डोळी नीटस, दाट काळेभोर केस असलेला, गोरा रंग नसला तरी चालेल, किंबहुना नसावा सावळा preferred पण काळा नको अशी सर्व मान्य कल्पना आहे. सौन्दर्याच्या कल्पनेचे प्रेरणा स्थान हे बहुदा चित्रपट आणि जाहिरात विश्व आहे असा माझा ठाम विश्वास आहे. आजकाल तर लहान मुलांचा “त्रास” नको म्हणून आई-बाप “Television ” किंवा “Mobile” त्यांच्या हातात देण्याचे सुटसुटीत उपाय योजतात. त्यामुळे तर ह्या कल्पना अगदी बाळ वयातच त्यांच्या मनावर बिंबवल्या जातात. मग काही सुज्ञ पालकांनी अमुक एक नटी सुंदर नाही तर रोगट दिसते असा कितीही टाहो फोडला तरी त्यांच्या षोडशेला तो टाहो ऐकू जात नाही.

शिक्षण संपता संपता गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली की मग तर हे अमुक एका नटा सारखी शरीरयष्टी कमावणे किंवा तमुक एका नटी सारखी त्वचा, केशभूषा आपली ही असावी अशी ध्येय ठेऊन मंडळी कामाला लागतात. त्यातून एखाद्याचे “corporate career” असेल तर सुंदर दिसणं आणि “up-to-date ” राहण्यावाचून पर्यायच नसतो (?). आजूबाजूची मंडळी सुद्धा एकदम चकचकीत! Branded कपडे वापरणारी आणि रोज सकाळी पाण्याच्या आंघोळी बरोबर deodorant ने अंघोळ करून येणारी… मुली makeup (निदान पावडर आणि lipstick) करून आणि नियमित beauty parlour मध्ये जाऊन चेहरा आणि हात, पाय ह्यांना polish करून येणाऱ्या….ह्या दरम्यान, beauty parlour हे मुलींच्या जीवनातील अविभाज्य घटक होऊन जाते.

नोकरी व्यवसायात स्थिरावल्यावर सौंदर्य प्रसाधनांच्या “गरजा” वाढीला लागतात. अमुक साबण वापरला की त्वचा अगदी “Facial” केल्या सारखी होते, तमुक Moisturizer वापरले की त्वचेवर थंडी चा परिणाम होत नाही, तमुक lipstick ओठांवर दिवस भर टिकते, अमुक Perfume किंवा Deodorant  ह्याने आपण दिवसभर टवटवीत रहातो, एवढेच काय, तमुक पावडर वापरली की दिवसभरातल्या सर्व गोष्टी चक्क आपल्या मनासारख्या होतात!! बाजारातील सर्व सौंदर्यप्रसाधने अशी अनंत वचने देत असतात. आपण आपल्याला “suit” होणारी प्रसाधने विकत आणून वापरू लागतो आणि त्याच्याशी एकनिष्ठ रहाण्याच्या प्रयत्न करत असतो. पण मग गंमत अशी होते की आपण एकनिष्ठ असलेली प्रसाधने बाजारातून गायब होतात आणि त्या जागी “new and improved” अशी लेबलं लावलेली नवीन प्रसाधने येतात. पण “New and Improved” वस्तू काही आपल्या मनात भरत नाही आणि “पुनःश्च हरिओम” म्हणत आपण आपल्याला suit होईल अश्या brand च्या शोधत निघतो. ह्या गर्तेत आपण कायमचे अडकतो….

जाहिरातींच्या कचाटयातून बिचारे केस सुद्धा सुटले नाहीत. “लंबे, घने, काले बाल” जाहिरातींमध्ये बघून बघून त्याच प्रकारचे केस म्हणजे सौंदर्याचे लक्षण होय असं जन मानसात गेली अनेक वर्ष बिंबवलं गेलं आहे. ह्या प्रचारामुळे अनेक लोकांना आपण किती कमनशिबी आहोत असं वाटत राहते. मग आपण ही “लंबे, काले, घने बालो के लिये” म्हणून अनेक पर्यायांची निवड करू लागतो. त्यावर सातत्याने भरपूर पैसे खर्ची घालतो. हे खरंच गरजेचं आहे का? हा प्रश्न स्वताः ला विचारून त्यावर चिंतन करत नाही. हल्ली अगदी कमी वयाचे स्त्रिया आणि पुरुष ही आपले केस अगदी नियमित पणे न चुकता रंगवून  घेतात. सरळ केस कुरळे करून घेतात किंवा कुरळे असतील तर सरळ करतात. थोडक्यात काय, जे आपल्याकडे नाही ते आपल्याला हवं असतं आणि ते कुठल्याही किमतीला आपण विकत घेत असतो.

उमेदीचा काळ सरून गेला की असं लक्षात येतं की कितीही moisturizer चोपडले तरी त्वचेचा कोरडेपणा काही कमी होत नाही. कितीही shampoo, conditioner वापरले तरी केसांचा पोत मुलायम होत नाही. हाताला, पायाला भेगा तर पडतच राहतात. आणि आपण त्याच त्याच ठिकाणी (म्हणजे सौन्दर्य प्रसाधनां मध्ये) ह्यावर उपाय शोधत राहतो. चेहऱ्यावर डाग पडले किंवा मुरूम पुटकुळ्या आल्या की जाहिराती बघून नवीन काहीतरी विकत आणतो किंवा beauty parlour मध्ये जाऊन चेहऱ्यावर काही प्रक्रिया करतो…ती सुद्धा एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करत रहावी लागते. सौन्दर्य, त्याहीपेक्षा तारुण्य टिकवण्यासाठी आपण आपल्या चेहऱ्यावर आणि केसांवर chemicals चा मारा करत रहातो.

अगदी प्रामाणिक पणे सांगायचं तर मी स्वतः कमी-अधिक फरकाने ह्या सर्व टप्प्यातून गेले आहे. काही वर्षांपूर्वी मात्र मला हलकेच एका प्रसंगाने सावध केलं. माझ्यावयाची एक आई जेंव्हा तिच्या लेकीच्या समस्यांसाठी सौन्दर्य प्रसाधनांमध्ये उपाय शोधताना दिसली तेंव्हा मला लहानपणी ची मी आठवले. जवळ जवळ नोकरीला लागे पर्यंत मी क्वचितच beauty parlor मध्ये प्रवेश केला होता. आमचं beauty parlor आमच्या घरातच होतं आणि beautician म्हणजे आमच्या मातोश्री! सर्व समस्यांवर स्वयंपाक घरातील रोजच्या वस्तू वापरून ईलाज केले जायचे. केसात कोंडा झाला, खोबरं आणि मेथी रात्री भिजत घालायची आणि सकाळी वाटून केसांना लावून ठेवायची…केस धुतले की कोंडा गायब आणि केस मुलायम! चेहऱ्यावर पुरळ किंवा फोड आले तर जायफळ उगाळून त्याचा लेप लावणे, दर रविवारी न चुकता शिकेकाई ने केस स्वछ धुणे, अधून मधून साबणा ऐवजी डाळीचे पीठ वापरणे असे अनेक उपाय योजना असत तिच्या जवळ. माझ्या पिढीतील आई ला मात्र हे काही ठाऊक नसावे, ह्याचं मला खूपच वाईट वाटलं! त्या क्षणा पासून फक्त केस कापण्या पुरतीच beauty parlor मध्ये जाऊ लागले.

२०१२ साली मला गंभीर अपघात झाला. नशिबाने त्यातून काही गंभीर परिणाम न होता मी पूर्ण बरी झाले. सक्तीच्या विश्रांतीच्या काळात मी स्वतःवर प्रयोग करू लागले. कोणत्याही रासायनिक पदार्थ न वापरता आपली त्वचा आणि केस ह्यांची निगा राखता येते का ते बघायचं ठरवलं. साबण, shampoo चा वापर ठरवून कमी करता करता पूर्ण बंद करून टाकले. आणि आश्चर्य म्हणजे मला माझ्या त्वचेत आणि केसांवर खूप चांगले बदल घडून येताना दिसले. मुळात त्वचेला साबण लावणं बंद केलं त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण खूपच कमी झालं. आधी उटणं नियमित वापरू लागले, मग लक्षात आलं की उटणं रोज लावायची गरज नाही. उटण्या ला स्वस्त आणि घरातले पर्याय म्हणजे वेगवेगळी पीठं वापरून बघितली. घरच्या घरी फळांच्या साली पासून scrubs करू लागले. संत्री किंवा आंब्याच्या साली उन्हात खडखडीत वाळवून mixer मध्ये वाटून घेतलं असता उत्तम scrub घरच्या घरी तयार होतं. त्वचा कोरडी वाटली तर तेलं आणि अत्यल्प प्रमाणात मधमाशी चं मेण किंवा कोकम खडा वापरून vaseline किंवा moisturizer तयार करू लागले. अजून एक महत्वाचं म्हणजे आपली त्वचा आणि केस हे आपल्या प्रकृतीचे निदर्शक आहे हे मान्य करून जर त्वचा आणि केस ठीक नाहीत, तर आपलं काय चुकतंय हे शोधायचा प्रयत्न करू लागले.

सौन्दर्य प्रसाधनांमधील रसायनांचा पर्यावरणात प्रदूषण करण्याला हातभार लागत असतो. रसायना व्यतिरिक्त त्या प्रसाधनांची वेष्टने सुद्धा पर्यावरणीय घन कचऱ्यात भर टाकत असतात. पर्यावरणाचा विचार करणं कदाचित प्रत्येकाला जमेल असं नाही कठीण ही वाटेल. पर्यावरण तूर्त बाजूला ठेऊन आपण निदान आपल्या प्रकृती चा विचार करणं गरजेचं आहे. सौन्दर्य प्रसाधनांमधील अनेक रसायनं ही आपल्या प्रकृतीला घातक असतात. काही रसायनं तर carcinogenic म्हणजे cancer होण्यासाठी कारणीभूत असतात, हे आपल्याला ठाऊकच नसतं . आपण कुठली रसायन अप्रत्यक्षरीत्या वापरतो आहोत आणि सातत्याने वापरल्यामुळे त्याचे शरीरावर काय परिणाम होतात निदान हे जाणून घेऊन मग ते वापरायचं की नाही हे ठरवावं.

वाढत्या वयाबरोबर lipstick आणि nailpolish ह्या गोष्टी तर कधीच माझ्या कपाटातून हद्दपार झाल्या होत्या . आता तर कुठलीही सौन्दर्य प्रसाधने विकत घ्यावीच लागत नाहीत. “हर बात होगी मनचाही..जब शुरुवात हो सही”, जाहिरातीच्या ह्या ओळीचा दुसरा अर्धा भाग आधी आमलात आणला, तर पहिला अर्धा भाग आपसूक साधला जातो ह्याचा मी स्वतः गेली काही वर्षे सातत्याने अनुभव घेते आहे. आणि हो, पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी माझा खारीचा वाटा देऊ शकते , ही आणखीन समाधानाची बाब!

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१०-मे-२०२१